कोरोना महामारीमुळे जगाप्रमाणेच भारतातही सगळीकडे भीतीचे आणि अनिश्चिततेचे मळभ दाटून आले आहे. पण त्याचवेळी भारतातील भांडवल बाजारात मात्र आशादायी चित्र निर्माण झाले आहे. बँकांमधील पारंपरिक अशा मुदत ठेवींमधल्या गुंतवणुकीला पर्याय शोधण्याकडे महिलांचा कल वाढत चालला आहे. या स्त्रियांपैकी बहुतेकजणी भांडवल बाजारात प्रथमच गुंतवणूक करायला लागल्या आहेत. शेअर बाजारातील वैयक्तिक गुंतवणुकीचा टक्का कोरोना काळात वाढला आहे आणि त्यात स्त्रियांचे प्रमाण लक्षणीय आहे. जणू टाळेबंदी ही स्त्रियांनी बँकांकडून शेअर बाजाराकडे वळण्याचे एक निमित्तच ठरली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे आणि बँकांच्या ठेवींवरचे व्याज हे इतके कमी आहे, की त्यावर जगणे मुष्किलच आहे. उलट चलन फुगवटय़ामुळे बचतीची रक्कमच आक्रसत चालली आहे. यावर पर्याय म्हणजे, शेअर, कर्जरोखे, कमॉडिटी बाजार हे आहे. या साधनांमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे सट्टेबाजीच आहे. असे वर्षोनुवर्षे मानले जात होते. शेअर बाजार म्हणजे नको रे बाबा, असे लाखो पुरुषांचेही मत होते. परंतु हळूहळू अर्थसाक्षरता वाढत असून, त्यामुळे एप्रिल ते जून 2020 या काळात महिलांकडून डिमॅट खाती उघडण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीच्या तुलनेत एप्रिल-जूनमधली ही वाढ 32 टक्के अधिक आहे. कोरोना व टाळेबंदीमुळे लाखो लोकांच्या नोकऱया गेल्या, पगार निम्म्यावर आले. यामुळे घरगुती खर्च भागवायचा कसा, अशा प्रश्न पडला. म्हणूनच शेअर बाजारात खरेदी-विक्री करून, उत्पन्न वाढवण्यासाठी महिला पुढे येऊ लागल्या आहेत.
सोन्याच्या भावात सातत्याने झालेली वाढ, बँकांच्या मुदत ठेवीवरचे घटलेले व्याजदर आणि जमिनी वा फ्लॅटच्या गुंतवणुकीतून फारसा न मिळणारा फायदा यामुळेदेखील स्त्रिया शेअर बाजाराकडे वळत आहेत. एक मार्च 2020 पासून देशात असे गुंतवणूकदार 11 लाखांनी वाढले असून, त्यापैकी 1 लाख 80 हजार महिला आहेत. एका आर्थिक पाहणीनुसार, भांडवल बाजारातील सक्रिय गुंतवणूकदार स्त्रियाचे सरासरी वय 33 वर्षें आहे. 70 टक्क्मयांपेक्षा अधिक महिला या गुंतवणुकीत प्रथमच उतरल्या आहेत. वेगवेगळय़ा दलाली पेढय़ांच्या ग्राहकांमध्ये 35 टक्के महिला आहेत. नाशिक, नागपूर, सुरत, गुंटूर, जयपूर, विशाखापट्टणम अशा टियर-टू व टियर-थ्री शहरातून येणाऱया महिला गुंतवणूकदारांचे प्रमाण 74 टक्के आहे. यातही विशेष म्हणजे, भांडवल बाजारातील एकूण स्त्री गुंतवणूकदारांमध्ये 55 टक्के गुंतवणूकदार या टेडिंग करणाऱया, तर 45 टक्के या गुंतवणूकदार आहेत. साधारणपणे 2010 सालपर्यंत स्त्रियांचा या क्षेत्रात वावर होता, पण तो कमी होता. त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने वाढला.
देशाचा विकासदर उणे 23 टक्के इतका झाला आहे. केवळ कष्टकऱयांचाच रोजगार गेला नाही, तर पांढरपेशांचाही गेला आहे. शिवाय सोन्याचे भावही भडकले आहेत. यामुळे शेअर बाजाराकडे वळण्यास पर्याय नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईमधील ‘फाइव्ह पैसा डॉटकॉम’ या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल-जून या तिमाहीत त्यांच्या स्त्री ग्राहकांमध्ये अगोदरच्या तिमाहीच्या तुलनेत 49 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. पैशाचे व्यवस्थापन या स्त्रियांनी स्वतःच्या हातात घेतले आहे. वेगवेगळय़ा वेबसाइट्समधून त्या शेअर व कमॉडिटी बाजाराची माहिती करून घेतात, तसेच सीएबीसी व प्रॉफिट अशा चॅनेल्सवरूनही वेगवेगळय़ा कंपन्यांबद्दल जाणून घेतात. फायर्स (एफवायईआरएस) या तंत्रज्ञानप्रधान दलाली पेढीचे संस्थापक आणि मुख्याधिकारी तेजस खोडे यांच्या मते, पूर्वी स्त्रिया बँकेतल्या ठेवी, सोने नाणे, टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड यात पैसे टाकत. परंतु टाळेबंदी आणि वर्क फ्रॉम होममुळे स्त्रिया घरात बसल्या बसल्या शेअर बाजारात मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करू लागल्या.
1990 च्या दशकात शेअर ब्रोकरच्या कार्यालयात स्त्रिया क्वचितच दिसत. परंतु इंटरनेट क्रांती झाली आणि प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्यामुळे माहिती मिळणे फारच सोपे झाले. शिवाय वेगवेगळय़ा चॅनेल्सवरही कोणते शेअर घ्यावेत, कोणते विकावेत, स्टॉपलॉसची मुदत काय असावी, अशी माहिती झटकन मिळते. खरेदी-विक्रीचे व्यवहारही आता घरात बसून करता येतात. त्यासाठी बाहेर जावे लागत नाही. नेट बँकिंग आणि पेमेंट्स ऍप्समुळे हे व्यवहार करणे अधिकच सुलभ झाले आहे. जेव्हा आपल्यावर अतिशय मोठे आर्थिक संकट येते तेव्हा जमीन, घर वा सोने पटकन विकता येत नाही. यातले सोने सोडता, ही मालमत्ता तुकडय़ा तुकडय़ांनीही विकता येणे शक्मय नसते. उलट शेअर, म्युच्युअल फंड वा रोख्यांमध्ये पैसे गुंतवले, तर त्याची हव्या त्या हिश्श्यात विक्री करून संकटावर मात करता येते, याची जाणीव महिलांना होऊ लागली आहे. अनेकाची मुले व यजमान यांना तातडीने हॉस्पिटलात दाखल करावे लागले. खासगी हॉस्पिटल्स डिपॉझिटची मोठी रक्कम घेतल्याशिवाय ऍडमिटच करून घेत नाहीत. असा एखादा बाका प्रसंग आल्यास, आपल्याकडील शेअरची विक्री करून पटकन पैसा उभा करता येतो, हेही स्त्रियांना कळायला लागले आहे. टाळेबंदीच्या काळात शेअर बाजार कोसळल्यामुळे, कित्येक चांगले शेअर्स स्वस्तात उपलब्ध झाले, हाही एक भाग आहेच. मात्र इथे एक गोष्ट मुद्दामहून नमूद केली पाहिजे. डीएसपी या संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार, भारतातल्या फक्त 33 टक्के महिला गुंतवणुकीचे निर्णय स्वतंत्रपणे घेतात. खरंतर विविध क्षेत्रांमधील महिलांचा वावर वाढत असूनही, हे प्रमाण एवढेच का, असा प्रश्न पडतो. कारण वित्तीय, बँकिंग तसेच मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रातही स्त्रिया झपाटय़ाने पुढे येत आहेत. कौटुंबिक अडचण असल्यास किंवा पालक वा पतीची अनुपस्थिती असली तर त्या स्वतःच निर्णय घेतात, असे या पाहणीत दिसून आले. कार किंवा घर घेताना महिलांपेक्षा पुरुषाच्या निर्णयाला कुटुंबात जास्त महत्त्व दिले जाते तर सोने, दागिने नि गृहोपयोगी वस्तू विकत घेताना, घरातल्या स्त्रीला काय वाटते, याचा विचार केला जातो. डीएसपीच्या या अहवालासाठी ज्या स्त्रियांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यातल्या फक्त बारा टक्के स्त्रियांनी सांगितले की, त्या शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा निर्णय स्वतः घेतात. पुरुषांच्या बाबतीत हे प्रमाण 31 टक्के होते. स्त्री-पुरुषात एवढा फरक असण्याचे कारण काय? मला इथे आठवण येते ती हॉलिवूडमधल्या ‘वॉलस्ट्रीट’ आणि ‘अमेरिकन सायको’ या चित्रपटांची. इंग्रजीत शेअर बाजार, सट्टेबाजी हे विषय अनेकदा आले आहेत. आज अमेरिकेतील वॉलस्ट्रीटमध्ये मोठय़ा प्रमाणात स्त्रिया काम करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर, ‘इक्विटी’ या चित्रपटात एका महिला बँकरची ठळक व्यक्तिरेखा आहे. दिग्दर्शक मधुर भांडारकरने ‘कॉर्पोरेट’ हा एक सुंदर सिनेमा बनवला होता. त्यात सहगल आणि मारवा या दोन उद्योग समूहांमधला संघर्ष दाखवला आहे. रजत कपूर आणि राज बब्बर यांनी या दोन समूहांच्या प्रमुखांचे काम केले होते. निशिगंधा दासगुप्ता (बिपाशा बसू) सहगल समूहाची उपाध्यक्ष असते. या संघर्षात आपले प्यादे होत असल्याचा अनुभव नायिकेला कसा येतो, हे या चित्रपटात दाखवले आहे. आज मात्र कॉर्पोरेट क्षेत्रात अधिक बदल होत आहेत. तिथे महिला आहेत आणि या क्षेत्राला लागणारी गुंतवणूकही त्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या पुरवत आहेत. तसेच या जगाचा त्या स्वतःच हिस्सा बनत आहेत, ही शुभवार्ताच म्हणावी लागेल.
नंदिनी आत्मसिद्ध