डॉ. निरंजना या जे. एन. मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या असून 32 वर्षांपासून कार्यरत : ‘महिला-बालकांचे आरोग्य’ या विषयावर महत्त्वपूर्ण संशोधन
आरोग्याकडे दुर्लक्ष…!
- महिला हे समाजाचे निम्मे बळ
- महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
- आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र परंतु आरोग्याबाबत उदासीन
- महिलांवर दुहेरी ताण
- स्त्री हा कुटुंबाचा चेहरा
प्रतिनिधी / बेळगाव
महिला हे समाजाचे निम्मे बळ असले तरी आजही त्यांच्या आरोग्याला कुटुंबात आणि समाजात फारसे प्राधान्य दिसत नाही. त्या आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र झाल्या आहेत. परंतु कुटुंबामध्ये त्यांचे आरोग्य दुर्लक्षित आहे. बदलत्या वातावरणामध्ये महिलांवर ताण वाढला आहे. अशावेळी स्वत:च्या आरोग्याची काळजी त्यांनी स्वत:च घेतली पाहिजे, असे मत डॉ. निरंजना महांतशेट्टी व्यक्त करतात.
डॉ. निरंजना या जे. एन. मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य असून, 32 वर्षापासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. महिला आणि बालकांचे आरोग्य या विषयावर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले असून त्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
डॉ. निरंजना या मूळच्या बडोद्याच्या. त्याकाळात त्यांच्या आजी या स्त्रीरोग तज्ञ म्हणून बडोद्याला कार्यरत होत्या. त्यांचे वडीलही प्रसिद्ध बालरोगतज्ञ व फिजिशीयन होते. आपल्या घरात आसपास सर्वत्र डॉक्टर असल्याने आपण लहानपणीच बालरोगतज्ञ म्हणजे डॉक्टर व्हायचे ठरविले होते. असे त्या म्हणतात. त्यांच्या वडिलांची जे. एन. एम. सी. चे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. आणि हे कुटुंब बेळगावला आले. जेएनएमसीमधूनच निरंजना यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर काही वर्षे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व नंतर जेएनएमसीमध्ये त्या कार्यरत आहेत.
वडिलांच्या प्रेरणेने मी विद्यार्थ्यांना शिकविण्यामध्ये विशेष रस घेतला. त्यामुळे प्राध्यापक म्हणून मी काम करू लागले. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांचे सांगणे ऐकत असत. आज वातावरण बदलले आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी अनेक स्त्राsतांकडून माहिती मिळते त्यामुळे शिक्षक, प्राध्यापक यांना अधिक सजग राहून विद्यार्थ्यांना शिकवावे लागते, असे त्यांना वाटते.
जेएनएमसीमध्ये काम करतानाच अनेक आरोग्यविषयक प्रश्नांवर त्यांनी काम केले. ज्ये÷ स्त्रीरोगतज्ञ डॉ. भालचंद्र कोडकणी यांच्या समवेत त्यांनी प्रसूतीवेळी होणारे महिलांचे व बालकांचे मृत्यू या विषयावर संशोधन केले. याची निरीक्षणे शिकागो येथे झालेल्या परिषदेमध्ये त्यांनी नोंदविली. प्रसूतीवेळी होणारे महिलांचे मृत्यू ही राष्ट्रीय समस्या असल्याने ‘फस्ट ब्रेथ’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प राबविताना डॉक्टर, आरोग्यसेवक व दाई या सर्वांना प्रशिक्षण दिले गेले. परिणामी मृत्यूदर कमालीचा घटला आणि संशोधन सार्थकी लागले, असे त्या म्हणाल्या.
‘हेल्पींग बेबीज ब्रेथ’ प्रकल्प
‘हेल्पींग बेबीज ब्रेथ’ हा दुसरा प्रकल्प त्यांनी राबविला. जन्मत: बाळ रडले नाही तर त्यासाठी पहिल्या एक म्हणजेच ‘गोल्डन मिनिट’मध्ये काय करावे याचे प्रशिक्षण त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्वांना दिले. त्यामुळे अनेक बाळांचे जीव वाचले. हा ‘नवजात शिशू सुरक्षा कार्यक्रम’ सरकारने दत्तक घेतला व अन्यत्र राबविला हे महत्त्वाचे. याचबरोबर जन्मलेल्या बाळाला किंवा मुदतपूर्व प्रसूती झालेल्या मातांच्या बाळांना सुरक्षितता लाभण्यासाठी ‘कांगारू मदर केअर’ हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत नवजात शिशूंना आईची उब दिली जाते. शिवाय अन्य महिला बाळाला आपल्या उराशी घेऊन त्याला उब देऊ शकतात.
डॉ. निरंजना यांच्या पुढाकाराने केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये नवजात शिशूंची विशेष काळजी घेतली जाते. मातांनी आपल्या बाळाला किमान सहा महिने स्तनपानाशिवाय काहीही देऊ नये यावर डॉक्टर भर देतात. त्यांच्या व सहकाऱयांच्या प्रयत्नामुळे त्या काम करत असताना सिव्हिल हॉस्पिटल आणि पुढे केएलई हॉस्पिटलला बेबी फ्रेंडली हॉस्पिटल म्हणून मान्यता मिळाली. स्तनपानाचे महत्त्व शहराबरोबरच ग्रामीण भागातही महिलांना पटवून दिले गेले. यासाठी उदाहरण म्हणून शिंदोळी गाव दत्तक घेतले गेले. माताना आणि अन्य महिलांना स्तनपानाचे महत्त्व पटवून दिल्याने पूर्वीचा 23 टक्के हा दर 72 टक्क्मयांवर गेला.
अनेक महिलांना जीवदान
डायरियामुळे बालमृत्यू होण्याचे प्रमाण वाढले. तेव्हा ओआरएस वर भर देऊन औषधे शक्मयतो टाळली गेली. तसेच मुदतपूर्व प्रसूती होताना महिलांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होते हे लक्षात घेऊन त्यासाठी वेगळी गोळी दिल्यास आराम मिळतो. बाळाचे यकृत प्रसरण पावते हे त्यांनी सप्रयोग सिद्ध केले. त्यामुळे अनेक महिलांना जीवदान मिळू शकले. याबरोबरच महिलांचा विशेषत: गर्भवतींचा आहार कसा असावा यासाठी न्यूट्रीशियन म्युझियम उभारण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.
प्राध्यापक, उपप्राचार्य, त्यानंतर प्राचार्य असे पद त्या भूषवितात. वडील ज्या कॉलेजचे प्राचार्य झाले त्याच कॉलेजच्या निरंजना प्राचार्य झाल्या. त्यावेळच्या भावना काय होत्या हे सांगताना वडिलांनी फार भक्कम पाया घातला होता. त्यांचा वारसा, त्यांची तत्त्वे पुढे नेणे हेच माझे ध्येय आहे. शिकविणे गांभीर्यानेच घ्यावे, असे मला वाटते असे त्यांनी नमूद केले.
स्त्री जेव्हा महत्त्वाच्या पदावर असते. तेव्हा तिच्या हाताखाली काम करणाऱया पुरुषांची मानसिकता वेगळी असते याकडे लक्ष वेधता त्या म्हणाल्या, जेव्हा आपण त्यांच्यापेक्षा अधिक काम करून स्वत:ला सिद्ध करतो तेव्हा इतरांनाही त्याचे अनुकरण करावे लागते. तुमचे म्हणणे ऐकले जाईल एवढी सक्षमता आपल्यामध्ये असायला हवा, अथवा ती वाढवायला हवी.
घरात आणि कुटुंबातील स्त्री आरोग्याबद्दल विचारता त्या म्हणाल्या स्त्री हा घराचा चेहरा आहे. परंतु ती दुर्लक्षित आहे. याला कांही अंशी तीही जबाबदार आहे. बदलत्या वातावरणात तिच्यावर ताण वाढला आहे. आजही त्यांच्यावर दुहेरी जबाबदारी आहे. ही जाणीव समाजात तळापर्यंत रुजायला हवी. इतरांची प्रतीक्षा न करता स्वत: आरोग्याला प्राधान्य द्यायला हवे.
…तुम्ही आनंदी राहिलात तर घर आनंदी
महिला सक्षमीकरणाची तुमची व्यख्या काय, या प्रश्नावर तुमचा प्राधान्यक्रम ठरवा. तुमची क्षमता ओळखा, सुपरवूमन होण्याच्या स्पर्धेत धावू नका, कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आई-वडीलच नव्हे तर सासू सासऱयांची काळजी घ्या. दिवस संपताना आपले घर आनंदी असणे आवश्यक आहे. तुम्ही आनंदी राहिलात तर घर आनंदी असणार आहे हे लक्षात घ्या, असे त्यांनी सांगितले.
अनेक पुरस्काराने गौरव
आपल्या सर्व वाटचालीमध्ये डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे व कॉलेजचे सर्व डॉक्टर यांचे तसेच पतीचे सहकार्य लाभल्याची नोंद त्या करतात. डॉ. निरंजना यांना उत्कृष्ट प्राध्यापक, उत्कृष्ट जिल्हा शाखा, स्तनपानासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तसेच उत्कृष्ट वैज्ञानिक अशा अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अनेक संस्थांच्या पाठय़वृत्तीच्या त्या मानकरी असून, अनेक वैद्यकीय संस्थांच्या त्या आजिव सभासद आहेत. कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कोविड वॉर्डमध्ये त्यांचे काम सुरू आहे.