मालवण शहर सुधारित विकास आराखडय़ावर हरकती
लोकप्रतिनिधींनी पुन्हा एकदा आवाज उठवावा!
मालवण:
राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून 5 ऑगस्ट 2019 रोजी सूचित मालवण शहर सुधारित विकास आराखडय़ातील 12 बदलांवर हरकती नोंदविणाऱया 28 हरकतदारांना आता 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत थेट कोकण भवन, नवी मुंबई येथे सुनावणीस हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘एकवेळ ऑनलाईन सुनावणी बरी होती’ असे म्हणायची वेळ आता आमच्यावर आल्याची प्रतिक्रिया काही हरकतदारांनी व्यक्त केली आहे.
या अगोदर 8 आणि 9 जुलै रोजी कार्यालयीन वेळेत ऑनलाईन सुनावणीचे आयोजन नगर रचना कोकण विभाग सहसंचालक कार्यालयाकडून करण्यात आले होते. मात्र, विविध कारणास्तव ऑनलाईन सुनावणीवर काही हरकतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आमदार वैभव नाईक यांना पत्र सादर करून या ऑनलाईन सुनावणीस आक्षेप घेतला होता. तर आमदार नाईक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना ऑनलाईन सुनावणी रद्द करून प्रत्यक्ष उपस्थितीद्वारे सुनावणी घेण्याबाबत निवेदन सादर केले होते. त्यानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. परंतु 10 ऑगस्ट रोजी थेट कोकण भवन, नवी मुंबई येथे सुनावणी आयोजित करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
एका हरकतदारास नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग कोकण विभागाकडून प्राप्त पत्रात 10 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता सहसंचालक, नगर रचना, कोकण विभाग, कोकण भवन, तिसरा मजला, कक्ष क्र. 305, कोकण भवन, नवी मुंबई येथे सुनावणी आयोजित करण्यात आल्याचे म्हटले आहे. याबाबत पालिका प्रशासनाशी संपर्क केला असता, सुनावणी नवी मुंबई येथे होणार असल्याबाबत दुजोरा देण्यात आला. त्यामुळे ‘रोगापेक्षा इलाज भारी’ असे चित्र सुनावणीबाबतीत निर्माण झाले असून लोकप्रतिनिधींनी पुन्हा याची दखल घ्यावी, अशी मागणी काही हरकतदारांनी केली आहे.
सुनावणी पुन्हा स्थगित होणार का?
ऑनलाईन सुनावणी रद्द करण्यात आल्यानंतर आता थेट कोकण भवनात होऊ घातलेली सुनावणी पुढे ढकलली जाणार का? हाच प्रश्न आहे. सुनावणीस आता काही दिवस शिल्लक आहेत. हरकतदारांच्या नोटिसीवर पेनने 28 जुलैची तारीख लिहिण्यात आली आहे. याबाबतची माहिती पालिका प्रशासनास मिळताच पालिका प्रशासनाकडून 3 ऑगस्ट रोजी हरकतदारांना मोबाईलवरून सुनावणीबाबत कल्पना देण्यात आली. तर गुरुवारी प्रत्यक्ष नोटीस देण्यात आल्याचे एका हरकतदाराने सांगितले. एवढय़ा कमी वेळेत तयारी करायची तरी कशी? त्यात परत कोरोना महामारीचे संकट आहेच. शिवाय प्रवास व निवासासाठी होणारा आर्थिक भुर्दंड नागरिकांनी का सहन करायचा, असा सवाल काही हरकतदारांनी केला आहे.