ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘आत्मनिर्भर यूपी रोजगार’ या अभियानामुळे स्थलांतरित मजुरांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होतील, तसेच रोजगाराच्याही संधी उपलब्ध होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या ‘आत्मनिर्भर यूपी रोजगार’ अभियानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन उद्घाटन केले. त्यावेळी मोदी बोलत होते. ते म्हणाले, लॉकडाउनमध्ये जे मजूर उत्तर प्रदेशात परतले आहेत, त्यांना आता सरकार रोजगार उपलब्ध करुन देत आहे. सव्वा कोटी मजुरांना रोजगार उपलब्ध करुन दिले जातील. योगी सरकारच्या चांगल्या कामांमुळेच आज जागतिक गुंतवणूकदार उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यात उत्सुक आहेत.
योगी अदित्यनाथ म्हणाले, आत्मनिर्भर यूपी रोजगार अभियानाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात ५ लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. या बरोबरच ५० लाख कामगारांना लघु तसेच मोठ्या उद्योगांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. उत्तर प्रदेशात विविध राज्यांमधून परत आलेल्या ३० लाख ४३ हजार स्थलांतरित मजुरांची कौशल्य चाचणी घेण्यात आली असून हे सर्व मजूर २४ लाख ७५ हजार कृषी कार्य, तसेच बांधकाम कार्याशी जोडले गेले होते, असेही त्यांनी सांगितले.