विजय सरदेसाई यांची माहिती : पेडणेसाठी जितेंद्र गांवकर यांची घोषणा
प्रतिनिधी / पणजी
गोंय, गोंयकार, गोंयकारपणाचा पुरस्कार करणारा गोवा फॉरवर्ड पक्ष येत्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देणार असून आयात केलेले उमेदवार मतदारांच्या माथी मारणार नाही, अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली.
पेडणेतील कार्यकर्ते ऍड. जितेंद्र गांवकर व त्यांच्या समर्थकांना पक्षात अधिकृत प्रवेश दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणुकीस वर्षभराप्नाक्षा जास्त अवधी असला तरी आम्ही आताच आमचे उमेदवार जाहीर करत असून अन्य पक्षांनी ते धाडस अद्याप केलेले नाही, असे ते म्हणाले. राज्यात सध्या कायदा, सुव्यवस्था पार कोलमडली असून कोणत्याही अधिकाऱयावर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण राहिले नसल्याची टीका त्यांनी केली. त्याही पुढे जाताना स्वतः भाजपचाच या मुख्यमंत्र्यावर विश्वास राहिलेला नाही, म्हणुनच दिल्ली भेटीवेळी त्यांच्यासोबत पक्षाच्या अध्यक्षांना पाठविण्यात आले होते, असा दावाही सरदेसाई यांनी पुढे केला.
पर्यटनमंत्री असलेले विद्यमान आमदार मनोहर आजगावकर हे भ्रष्टाचारात पार बरबटलेले असून पेडणेतील लोक त्यांना पूर्ण कंटाळलेले आहेत. त्यामुळे त्यांना पर्याय हवा असून तो पर्याय ऍड. गावकर यांच्या रुपात आम्ही त्यांना देणार आहोत, असे ते म्हणाले. आजगावकर यांच्या काळात पेडणेत सरकार पुरस्कृत दहशतवाद चालला आहे, रेती माफियाराज चालले आहे, त्यात भर म्हणून आता तेथे पाणी माफियाही निर्माण झाले आहेत, मोप विमानतळासाठी टँकरद्वारे पुरविण्यात येणाऱया पाण्याच्या प्रत्येक टँकरमागे सुद्धा ते हप्ते वसुली करत असल्याचा आरोप स्थानिकांतून करण्यात येत असून या सर्व भ्रष्टाचारातून त्यांना मुक्ती देण्यासाठी गोवा फॉरवर्डचा उमेदवार आम्ही देणार आहे, पेडणेत आता ‘हप्ताबंद आंदोलन’ चालू झाले आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.
देऊ मांद्रेकर यांच्यानंतर आतापर्यंत कित्येक निवडणुकात पेडणेला बिगर पेडणेवासीय, आयात केलेले लोकप्रतिनिधीच मिळाले. त्यामुळे त्यांनी पेडणेच्या विकासासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आता ऍड. गावकर यांच्या रुपाने एक सुशिक्षित व जनसामान्यात वावरणारा उमेदवार आम्ही देणार आहोत, असे सरदेसाई म्हणाले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या निक्रीयेमुळेच म्हादई गोव्याच्या हातातून निसटली आहे, सध्या दिल्ली भेटीवर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अनेक मंत्र्यांची भेट घेतली. परंतु तेथे ते म्हादईसंदर्भात कुणाशी बोलले नाहीत, नपेक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये जाऊन त्यांनी म्हादई प्रकरणाची साधी चौकशी सुद्धा केली नाही, असा आरोपही सरदेसाई यांनी केला.