कृषी पर्यटन, स्थानिक टूर पॅकेज सुरू केल्यास मिळू शकते संजीवनी
कोरोनामुळे थांबलेल्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्याची गरज
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे पर्यटन व्यवसायला मोठा फटका बसला आहे. सिंधुदुर्गसारख्या पर्यटन जिल्हय़ात तर आर्थिक घडी पूर्णत: विस्कटून गेली आहे. जिल्हय़ात बाहेरून येणाऱया पर्यटकांना अजून बराच कालावधी जाऊ शकतो. अशा स्थितीत स्थानिक पर्यटनावर लक्ष केंद्रीत करून पर्यटन टूर पॅकेज, कृषी पर्यटन सुरू केल्यास पर्यटन व्यवसायाला संजीवनी मिळू शकते. यासाठी जिल्हा प्रशासन आणि पर्यटन संस्थानी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. पर्यटन महामंडळाने सुद्धा जागतिक पर्यटन दिनी ग्रामीण पर्यटनालाच प्राधान्य देण्याचे जाहीर केले आहे.
27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. यावषी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पर्यटन दिन साधेपणाने साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या या संकटकाळात पर्यटन वृद्धीसाठी काय करता येईल, याबाबत हा उहापोह.
मालवण ठरयेत पर्यटनाचा केंद्रबिंदू
गेल्या काही वर्षांत जिल्हय़ाच्या पर्यटन विकासाला चालना मिळत आहे. अनेक बेरोजगार तरुण नोकरीच्या मागे न लागता पर्यटन व्यवसायात नशीब आजमावात आहेत. मालवण हे सिंधुदुर्ग जिल्हय़ातील पर्यटनाचे प्रमुख केंद्र आहे. या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ला, स्कुबा डायव्हिंग, देवबाग येथील जलक्रीडा, बॅक वाटर अशा पर्यटनाच्या अनेक संधी आहेत. परंतु हा पर्यटन व्यवसाय गेले सहा महिने बंद आहे. आता पाऊस कमी होताच पुन्हा पर्यटन व्यवसायाला संधी आहे. परंतु कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीवर मार्ग काढण्याची गरज आहे. हा मार्ग म्हणजे तूर्त स्थानिक पर्यटनावर लक्ष केंद्रित करणे.
पर्यटकांची अनुत्सुकता अजूनही
दिवाळीचा हंगाम नजीक येतोय. परंतु, या हंगामावरही कोरोनाचे संकट कायम आहे. मुंबई, पुणे या मोठय़ा शहरांसह आणि गोव्यातील पर्यटकांवर सिंधुदुर्गचा पर्यटन व्यवसाय मुख्यत्वे करून अवलंबून आहे. मालवणात गेल्या काही दिवसांत किरकोळ स्वरुपात पर्यटकांची ये-जा सुरु झाली आहे. मात्र खूप काळजी घेऊनच पर्यटकांना आणले जात आहे. तरीही आलेल्या पर्यटकांची संख्या फार मोठी आहे, असेही नाही. पुणे, मुंबईसह इतर राज्यातील व परदेशातील जेव्हा पर्यटक येतात, तेव्हा निश्चितच येथील बरेचसे पर्यटनामधून मोठे चलन मिळते आणि जिल्हय़ाच्या अर्थव्यवस्थे मध्येही त्याची भर पडते. परंतु हे जिल्हय़ाच्या बाहेरून येणाऱया पर्यटकांची वाट पाहावी लागेल. कोरोनामुळे अजूनही पर्यटनासाठी जिल्हय़ाबाहेरून पर्यटक येण्यास तयार नाहीत. अशा वेळी स्थनिक पर्यटनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
स्थानिक पर्यटन देऊ शकते संजीवनी
स्थानिक पर्यटनावर लक्ष केंद्रित करताना सिंधुदुर्ग जिल्हय़ात जिल्हय़ातल्या जिल्हय़ात पर्यटन पॅकेज टूर सुरू केल्यास पर्यटनाला काही प्रमाणात संजीवनी मिळू शकते. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून संपूर्ण जिल्हय़ात अनेक पर्यटन स्थळे आहेत त्यांना भेटी देता येतील, सिंधुदुर्ग जिल्हय़ातील अनेक लोक असे असतील की त्यांनी जिल्हय़ातील पर्यटन स्थळे पाहिली नसतील. त्यांना पर्यटन टूरच्या माध्यमातून पर्यटन करता येईल आणि यातूनच पर्यटन व्यवसायला चालना मिळू शकते तसेच कृषी पर्यटनालाही मोठी संधी आहे. जिल्हय़ात अनेक ठिकाणी कृषी पर्यटन स्थळे आहेत त्यालाही चालना मिळेल.
एक पर्याय निवडावाच लागेल
सध्याच्या बिकट स्थितीत जिल्हय़ातील स्थानिक पर्यटकांकडे लक्ष केंद्रित केले गेले, तर त्याचा थोडाफार फायदा भविष्यात होऊ शकेल, असा एक मतप्रवाह आहे. परंतु, त्याकरिता आपला जिल्हा कोरोनामुक्त व्हायची वाट पाहायची की शासनाच्या नियमावलीनुसार कोरोनाबाबतची जास्तीत जास्त काळजी घेऊन पर्यटन सुरू करायचे, याबाबत ठाम निर्णय घ्यावा लागेल.
ग्रामीण पर्यटनाला प्राधान्य – प्रादेशिक पर्यटन अधिकारी दीपक माने
कोरोनामुळे गेले सहा महिने पर्यटनाला ब्रेक लागला हे खरे आहे. परंतु, आता कोविडचे नियम पाळून हळूहळू पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने ग्रामीण पर्यटनावर अधिक भर देण्याचा निर्णय पर्यटन विकास महामंडळाने घेतला आहे, अशी माहिती कोकण विभाग प्रादेशिक पर्यटन अधिकारी दीपक माने यांनी दिली. कोकणातील पर्यटन महामंडळची सर्व पर्यटन रिसॉर्ट पर्यटकांसाठी खुली केली आहेत, असे ते म्हणाले.
शोधा, म्हणजे मार्ग सापडेल!
आज कोरोनामुळे समोरच्या प्रत्येक अनोळखी माणसाकडे संशयाने पाहिले जाते. पण या भीतीपोटी जिल्हय़ात सर्वच आर्थिक व्यवहार आणि व्यापार बंद आहेत असेही नाही. जास्तीत जास्त काळजी घेऊन तालुक्यात किंवा एका तालुक्यातून दुसऱया तालुक्यात कामानिमित्त लोक बाहेर पडतच आहेत. जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणाखाली यावी, यासाठी खबरदारी घेण्यासाठी पावले उचलली जात आहेत. या प्रयत्नांना यश येवो, हीच सर्वांची प्रार्थना आहे. मात्र भविष्यात आपल्या जिल्हय़ातील कोरोनाचे संकट टळले, तरी परजिल्हा किंवा राज्यातून येणाऱया पर्यटकांचा म्हणावा तसा प्रतिसाद नाही मिळाला तर स्थानिक पर्यटक हा पर्याय आपल्याला निवडता येऊ शकतो. पण त्यादृष्टीने आपण तयार आहोत का याचा विचार व्हायला हवा. स्थानिक पर्यटनाच्या बाबतीत सांगायचं, तर जिल्हय़ातील अनेकांनी अद्याप किल्ले सिंधुदुर्ग पाहिलेला नाही. देवगड, मालवण व वेंगुर्ले येथील कित्येक निसर्गरम्य समुद्रकिनाऱयावरील रुपेरी वाळूतून कित्येक जिल्हावासीयांना चालायचे आहे. वेंगुर्ले खाडीतील कांदळवन सफर करायची आहे. खाडय़ांमध्ये बॅकवॉटरचा आनंद घ्यायचा आहे. मालवणी जेवणावरही ताव मारायचा आहे. जिल्हय़ातील प्रमुख मंदिरांमध्ये एकाच दिवशी देवदर्शन करायची सुप्त इच्छा काहींच्या मनात आहे. अशा विविध पर्यायांद्वारे स्थानिक पर्यटकांना आपण पर्यटनाचा आनंद देऊ शकतो का, त्यासाठी सवलतीचे दर किंवा विशेष योजना आपण आखू शकतो का, असे मुद्दे सध्या चर्चेत आहेत. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, खासदार, आमदार आणि प्रमुख राजकीय मंडळींनी पर्यटन व्यावसायिकांकडून केल्या जाणाऱया सूचनांचा विचार करून सिंधुदुर्गच्या पर्यटनाला कोरोना काळात चालना कशी देता येईल, याचा विचार मात्र नक्कीच करायला हवा.