प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने आंतरराज्य बससेवा सुरू केली आहे. बेळगाव आगारातून रोज मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा या गावांसाठी 60 ते 70 बसेस धावत आहेत. मात्र सावंतवाडी, हैदराबाद या शहरांसाठी अद्याप बससेवा सुरू नाही. तसेच लांब पल्ल्यासाठी धावणाऱया वातानुकुलीत बसेसनासुद्धा अद्याप परवानगी मिळालेली नाही.
लॉकडाऊनपूर्वी बससेवेचे जे वेळापत्रक होते त्यानुसारच गाडय़ा धावत आहेत. त्यातही राज्यांतर्गत धावणाऱया बसेसना प्रवाशांचा प्रतिसाद उत्तम आहे. मात्र महाराष्ट्रात जाणाऱया गाडय़ांना अल्पप्रतिसाद आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट हे अधिक गडद असल्याने प्रवासी तेथे जाण्यास राजी नाहीत.
बेळगावला कोल्हापूर आगाराच्या बसेस येत आहेत. मात्र सांगली, सातारा, पुणे, मुंबई येथून अद्याप बसेस येत नाहीत. एकीकडे उत्पन्न वाढीसाठी परिवहन मंडळ प्रयत्नशील आहे. परंतु प्रवाशांच्या मनात अद्याप भीती असल्याने बस प्रवास करण्यास त्यांची तयारी नाही.
एकूणच परिवहन मंडळ आपल्या परीने प्रयत्न करत असून काही दिवसांनी कोरोनाची तीव्रता कमी होईल आणि प्रवाशांची संख्या वाढेल, असा विश्वास मंडळाला वाटतो. बसमध्ये प्रवास करतानासुद्धा कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे मंडळाने कळविले आहे.