भारत-इंग्लंड महिलांची एकमेव कसोटी अनिर्णीत, राणाचे नाबाद अर्धशतक, शफाली सामन्यात सर्वोत्तम
वृत्तसंस्था/ ब्रिस्टॉल
पदार्पणवीर स्नेह राणा (नाबाद 80) व यष्टिरक्षक तानिया भाटिया (नाबाद 44) या तळाच्या फलंदाजांनी नवव्या गडय़ासाठी केलेल्या अभेद्य 104 धावांच्या झुंजार भागीदारीमुळे इंग्लंडविरुद्धची एकमेव महिला कसोटी अनिर्णीत राखून भारतीय महिलांनी पराभव टाळण्याचा पराक्रम केला. फॉलोऑननंतर भारताने चौथ्या दिवशी 121 षटकांत 8 बाद 344 धावा जमविल्या.
इंग्लंड महिलांनी या सामन्यात प्रथम फलंदाजी करून 9 बाद 396 धावांवर डाव घोषित केल्यानंतर भारताचा पहिला डाव 167 धावांच्या दमदार सलामीनंतरही 231 धावांत आटोपला होता. फॉलोऑन मिळाल्यानंतर भारताने तिसऱया दिवशी 1 बाद 83 धावा जमविल्या होत्या. शेवटच्या दिवशी या धावसंख्येवरून भारताने डाव पुढे सुरू केला आणि पहिल्या डावाप्रमाणे पुन्हा एकदा डाव गडगडला. पूनम राऊत (39) व दीप्ती शर्मा (54) यांनी तिसऱया गडय़ासाठी 72 धावांची भागीदारी केल्यानंतर 3 बाद 171 वरून 7 बाद 199 अशी भारताची स्थिती झाली. स्नेह राणाने आठव्या गडय़ासाठी शिखा पांडेसमवेत (18 धावा) 41 धावांची भागीदारी केल्यानंतर भारताची 8 बाद 240 अशी स्थिती झाली, तेव्हा इंग्लंडचा विजय निश्चित मानला जात होता. पण पदार्पणवीर स्नेह राणा व तानिया भाटिया या दोघींनी झुंजार फलंदाजी करीत नवव्या गडय़ासाठी अभेद्य शतकी भागीदारी करीत इंग्लंडला विजयापासून दूर ठेवले. पहिल्याच कसोटीत खेळत असूनही या दोघींनी सफाईदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. गोलंदाजीत 4 बळी मिळविलेल्या स्नेह राणाने 154 चेंडूत 13 चौकारांसह नाबाद 80 धावा काढल्या तर तिला साथ देणाऱया तानियाने 88 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 44 धावा जमविल्या.
त्याआधी सलामीवीर 17 वर्षीय शफाली वर्माने दुसऱया डावातही अर्धशतक झळकावत कसोटी पदार्पणात दोन्ही डावात अर्धशतके नोंदवणारी सर्वात युवा फलंदाज आणि एकंदर चौथी फलंदाज होण्याचा मान प्राप्त केला. तिलाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान देण्यात आला. इंग्लंडच्या पहिल्या डावात स्नेह राणाने चार बळी मिळविल्यानंतर आपल्या दिवंगत वडिलांना ते यश समर्पित केले होते. दुसऱया डावात तिने फलंदाजीत दाखविलेला झुंजार बाणा पाहून तिच्या वडिलांनाही अभिमान वाटला असेल. तिने या खेळीत ड्राईव्ह, कट, फ्लिकचा सढळ वापर करीत पहिले अर्धशतक नोंदवले.
फॉलोऑननंतरही तब्बल 121 षटके फलंदाजी करीत भारताने टाळलेला पराभव, ही भारतीय महिलांची विदेशातील सर्वोत्तम कामगिरी असल्याचे म्हटले जात आहे. इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोनने या डावातही 4 बळी मिळवित तिने सामन्यात एकूण 8 बळी मिळविले. याशिवाय नॅट स्किव्हरने 2, हीदर नाईट व कॅथरिन ब्रंट यांनी एकेक बळी मिळविले. गेल्या 26 वर्षापासून भारतीय महिला संघ इंग्लंड महिलांविरुद्ध अपराजित राहिला आहे. आता याच दोन संघांत संघांत 3 वनडे व 3 टी-20 सामन्यांची मालिका होणार असून त्याची सुरुवात 27 जूनपासून याच मैदानावर होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड महिला प.डाव 9 बाद 396 डाव घोषित, भारत महिला प.डाव सर्व बाद 231, फॉलोऑननंतर दुसरा डाव 121 षटकांत 8 बाद 344 ः शफाली वर्मा 63 (83 चेंडूत 11 चौकार, 1 षटकार), दीप्ती शर्मा 54 (168 चेंडूत 8 चौकार), पूनम राऊत 39 (104 चेंडूत 5 चौकार), पूजा वस्त्रकार 12, स्नेह राणा नाबाद 80 (154 चेंडूत 13 चौकार), शिखा पांडे 18 (50 चेंडूत 3 चौकार), तानिया भाटिया नाबाद 44 (88 चेंडूत 6 चौकार), अवांतर 14. गोलंदाजी ः एक्लेस्टोन 4-118, स्किव्हर 2-21, ब्रंट 1-49, नाईट 1-41.