प्रतिनिधी/ बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये प्रेरणा महोत्सवानिमित्त विविध तज्ञांची व्याख्याने आयोजित केली आहेत. त्यातील पहिले व्याख्यान संगणक विभागाच्या प्रा. डॉ. मल्लम्मा रेड्डी यांनी गुंफले. डॉ. रेड्डी या राणी चन्नम्मा विद्यापीठात संगणक विभागाच्या प्राध्यापिका आणि वेब डिझायनिंग व आयटीच्या नोडल ऑफिसरही आहेत. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. मनीषा नेसरकर होत्या.
स्पर्धा परीक्षांमधील ‘विविध संधी आणि विद्यार्थ्यांची कर्तव्ये’ या विषयावर बोलताना डॉ. मल्लमा रेड्डी म्हणाल्या, आपल्या अंगी असंख्य सुप्त शक्ती आहेत. जन्मभर त्या सुप्तच ठेवणे हा स्वतःच स्वतःवर केलेल्या अन्याय आहे. त्या शक्ती व इतर सुप्त सामर्थ्ये ओळखून त्या जागरुक करणे, त्या अनुषंगाने आपल्या करिअरची दिशा निश्चित करणे, ही स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्याची पहिली पायरी आहे.
आपण ग्रामीण भागातून आलो, आपले शिक्षण आपल्या मातृभाषेतून झाले आहे, आपणास उत्तम इंग्रजी येत नाही, असे न्यूनगंड बाळगणे खूप घातक आहे. उलट आपण ग्रामीण भागातून आपले सत्व घेऊन आलो आणि मातृभाषेतून शिक्षण घेतले याचा अभिमान बाळगा. कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो. या व्याख्यानात त्यांनी विविध स्पर्धा परीक्षा आणि त्यांची तयारी करण्यासाठीची कौशल्ये यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्रा. डॉ. मनीषा नेसरकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून या स्पर्धांची आवश्यकता स्पष्ट केली.