फेमिना मिस इंडिया फेम रती हुलजी यांची पत्रकार परिषदेत माहिती
आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. त्यामुळे स्पर्धेत राहून आपले कौशल्य इतरांना दाखवून देणे, हे महत्त्वाचे आहे. माझ्यासमोर मुंबई, दिल्ली, कोलकाता येथील एकापेक्षा एक सरस स्पर्धक होते. परंतु या सगळय़ांचा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वास दाखविल्यास आपल्याला यश नक्की मिळते. त्यामुळे आपण कोणत्या भागात राहतो याचा जास्त बाऊ न करता गुणवत्ता सिद्ध करावी, अशी माहिती फेमिना मिस इंडिया टॉप फाईव्हमध्ये निवड झालेल्या बेळगावच्या रती हुलजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नुकत्याच झालेल्या फेमिना मिस इंडियाच्या पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये निवड झालेल्या रती यांनी स्पर्धेनंतर प्रथमच बेळगावला भेट दिली. हॉटेल ऑर्चिड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला आजवरचा प्रवास उलगडला. मॉडेलिंग क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून काम करत असल्यामुळे या स्पर्धेसाठी विशेष अशी तयारी करावी लागली नाही. घरच्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे हे यश मिळू शकले. बेळगावची असल्याने प्रथम मिस कर्नाटकमध्ये दाखल झाले. त्यामध्ये यश मिळवत विजेतेपद मिळाले. यामुळे मिस इंडियामध्ये जाता आले. तेथे प्रत्येक क्षणाचा अनुभव काही वेगळाच असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बेळगावमधील विविध संघ, संस्था व त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांचा सत्कार केला.