प्रतिनिधी /बेळगाव
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावेळी देशाला कुष्टरोगमुक्त बनविण्याविषयी नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. याबरोबरच कुष्टरोग निर्मूलनाच्या कामात प्रत्येकाने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात रविवारी सकाळी कुष्टरोग निवारण दिन कार्यक्रमात ते बोलत होते. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाबरोबर कुष्टरोगमुक्त भारताच्या दिशेने वाटचाल या घोषवाक्मयाने ‘स्पर्श : कुष्टरोग जागृती अभियान’ या कार्यक्रमाला चालना देण्यात आली. जागृतीसाठीच्या भित्तीपत्रकांचे अनावरण यावेळी करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, आपला देश पोलिओमुक्त झाला आहे. वेळेत औषधोपचार दिल्यास पूर्णपणे कुष्टरोगमुक्त जिल्हा बनविणेही शक्य आहे. त्या दिशेने आरोग्य व कुटुंब कल्याण खाते उत्तम प्रयत्न करीत आहे. बेळगावसह राज्यात कोरोनाविरुद्धच्या लढय़ातही आरोग्य विभाग आघाडीवर आहे. पहिला डोस शंभर टक्के पूर्ण झाला आहे. 88 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. या कामातही आशा कार्यकर्त्या, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱयांनी उत्तम कामगिरी केली आहे, असे कौतुक त्यांनी केले.
जिल्हा कुष्टरोग निवारण अधिकारी डॉ. चांदणी देवडी म्हणाल्या, कुष्टरोग हा एक प्राचीन काळापासूनचा रोग आहे. उपचार न घेतलेला कुष्टरोगी शिंकल्यास रोगाणू हवेतून दुसऱयांच्या शरीरात प्रवेश करतात. त्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यावर त्यालाही कुष्टरोग होतो. कुष्टरोगाची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास जवळच्या सरकारी इस्पितळात तपासणी करून घ्यावी. ही तपासणी व उपचार मोफत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात डॉ. महेश किवडसण्णावर, भरत एच. बी., डॉ. सुरेश वर्गीस, हर्षा गुडसलमनी, डॉ. उदय कुडची आदी उपस्थित होते. सरिता सानिकोप आणि चमूने स्वागतगीत सादर केले. सी. जी. अग्निहोत्री यांनी सूत्रसंचालन केले. तालुका आरोग्याधिकारी शिवानंद मास्तीहोळी यांनी आभार मानले.