प्रतिनिधी / कोल्हापूर
चीनकडून वारंवार होणाऱया घुसखोरीबद्दल काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी 10 जून रोजी आवाज उठवला होता. पण मोदी सरकारच्या निष्क्रीयतेमुळे 15 जून रोजी पहाटे चीनसोबत झालेल्या चकमकीत 20 जवान शहीद झाले. त्यानंतर तब्बल दोन दिवसांनी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरद्वारे जवानांना श्रद्धांजली वाहिली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशात चीनने घुसखोरी केलीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे पंतप्रधानांनी देशातील जनतेला संभ्रमात न टाकता चीनच्या घुसखोरीला कठोर उत्तर द्यावे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार ‘स्पिकअप् इंडिया’ अभियान राबविले जाणार आहे. या माध्यमातून काँग्रेसकडून पंतप्रधानांना पाच प्रश्न विचारले जाणार असून त्याद्वारे चीनच्या घुसखोरीबद्दल जाब विचारणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
काँग्रेसच्यावतीने राज्यभरात ‘शहिदों को सलाम’ दिवस पाळण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी सकाळी 11 वाजता पापाची तिकटी येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर मेणबत्त्या पेटवून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तिन्ही सैन्य दलास समर्थन, शहिद जवानांना वंदन करणारे, आणि चीनी सैन्याने हडपलेली भारतीय भूमी परत घेण्याची केंद्र सरकारकडे मागणी करणारे फलक घेऊन कोणतीही घोषणाबाजी न करता सकाळी 11 ते 12 या वेळेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी काँग्रेसच्यावतीने भूमिका स्पष्ट केली. यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम, महापौर निलोफर आजरेकर, आमदार पी.एन.पाटील, चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, जि.प.अध्यक्ष बजरंग पाटील, करवीर सभापती अश्विनी कृष्णात धोत्रे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण,उपमहापौर संजय मोहिते, ऍड.सुरेश कुऱहाडे, गोकुळ संचालक बाळासो खाडे, गुलाबराव घोरपडे, सचिव संजय पोवार-वाईकर, चंदा बेलेकर, सुलोचना नायकवडी, संध्या घोटणे, तौफिक मुल्लाणी, दीपक थोरात आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, लडाखमधील गलवान खोऱयात 15 जून रोजी चीनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष सीमारेषेवर तणाव निर्माण झाला आहे. गलवान खोऱयातील सॅटेलाईट इमेज जारी केलेल्या छायाचित्राच्या आधारे चीन गलवान खोऱयात बंकर बनवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. चीनची पीपल्स लीबरेशन आर्मीने त्सो तलाव परिसरात अजून ठाण मांडले आहे. इतकेच नव्हे तर या खोऱयात चीनकडून हळूहळू लहान गटांद्वारे वारंवार सैन वाढवले जात आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चीनने आपल्या देशात घुसखोरी केली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकी वस्तुस्थिती सांगून भारतीय जनतेची माफी मागावी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार प्रश्नांची उत्तरे द्यावीत
पालकमंत्री पाटील म्हणाले, भारतीय हद्दीत चीनकडून घुसखोरी झालीच नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली `speak up for our jawans’ या अभियानामार्फत काँग्रेस पक्षाकडून विचारलेल्या प्रश्नांची पंतप्रधानांनी उत्तरे द्यावीत. गलवान खोऱयातील 20 जवानांची चीनने हत्या केली. तरीही आपल्या हद्दीमध्ये कोणी घुसखोरी केली नाही, असे वक्तव्य करून पंतप्रधान मोदींनी चीनला क्लिन चिट दिली काय ? आता गलवान खोरे भारतीय हद्दीत नाही काय ? गेल्या दोन महिन्यात पॅगॉग सरोवराच्या भागात चीनने बेकायदेशीररित्या कब्जा केला, तो आता भारतीय प्रदेशाचा भाग नाही का ? जर गलवान आणि पॅगॉग भारतात नाही तर मग कुठे आहे ? या चार प्रश्नांची पंतप्रधानांनी उत्तरे द्यावीत, असेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
चीनी वस्तुंवरील बहिष्काराबाबत अद्यादेश काढावा
भाजपचे नेते आणि कार्यकर्त्याकडून केल्या जाणाऱया आंदोलनामध्ये चीनी वस्तुंची जाळपोळ करून बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जाते. बहिष्काराबाबत आवाहन करणारे आणि आंदोलनाचे ट्विटरवर टाकले जाणारे फोटो मात्र चीनी मोबाईलवरून काढले आहेत. चीनचे लोक मोदींचे कौतूक करत असून भारताची जगात नाचक्की झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोंदेंना खरोखरच चीनला धडा शिकवायचा असेल तर त्यांनी चीनी वस्तुंवरील बहिष्काराबाबत अद्यादेश काढावा. तरच चीनच्या मुसक्या आवळणे सोपे होईल असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.