‘मॅडम, काय करावं सुचत नाही. माझी मुलगी रिमा गेला दीड महिना माझ्याजवळ आहे. या मुलीला कसं समजवावं तेच कळत नाही. 5-6 वर्षे झाली नाही संसाराला तर कंटाळून कसं चालेल?’ ‘काय झालं आहे? सासरी काही प्रॉब्लेम आहे का?’ ‘तसं काही नाही. हिचाच सगळा गोंधळ झालाय. खरं सांगायचं तर वेगवेगळी कौशल्यं असलेली उच्चशिक्षित मुलगी ही! तशी करिअर ओरिएण्टेडच म्हणा ना!आमच्याकडे सारेच उत्तम शिकलेले आणि तसे सगळेच उच्चपदस्थ! अगदी मोकळं वातावरण.
अर्थात ती शिकली म्हणून किचनमधलं तिला काही येत नाही अशातला भाग नाही. घरात सगळी कामं समजुतीनं विभागून करण्याची सवय आहे. त्यामुळे काही करता येत नाही वगैरे असं नाही. तिच्या सासरची मंडळीही उच्चशिक्षित आहेत. तसा म्हणावा असा काही प्रॉब्लेम नाही. परंतु थोडं असं झालं की लग्नानंतर महिनाभरात तिच्या सासुबाईंना अर्धांगाचा झटका आला. ही तशी अगदी नवीनच. तिच्याखेरीज घरात कुणी स्त्री नाही. त्यावेळी तिच्या सासऱयांनी आणि मी तिला समजावलं होतं. नोकरी सोडण्याचा निर्णय शक्मयतो घेऊ नको. परंतु तिने ऐकलं नाही. तिचा तिनेच नोकरी सोडायचा निर्णय घेतला. आम्हीही फार हस्तक्षेप केला नाही तिच्या निर्णयामध्ये. तिने सगळं नीट केलं सासुबाईंचं. 6 महिन्यांनी त्या अगदी व्यवस्थित बऱयाही झाल्या. नातेवाईकांनी खूप कौतुक केलं तिचं. कौतुकानं एका वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवलं तिला.
आदर्श सून वगैरे.. मी तिला काही गोष्टी त्याहीवेळी समजावून सांगितल्या. परंतु ते गुडी गुडी म्हणून घेणं याचं व्यसन लागलं म्हणा तिला. पुढे वर्षभरातच मुलगा झाला. आता नोकरी सोडलीच आहे तर आणि थोडं थांबूया हे करत करत 5-6 वर्षे ही पूर्ण घरातच बसली. अगदी स्पष्ट आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर मुळात केवळ तेवढंच करणं हा तिचा पिंडच नाही आणि तशी कुणी सक्तीही केली नाही तिच्यावर. पण हीच खूप गुंतत गेली. आता हळूहळू चिडचिड सुरू झाली. सर्वांपासून हळूहळू अंतर राखू लागली. सारखी पाहुण्यांची ये जा आता तिला कंटाळवाणी वाटू लागली. गुणगान गाणारे तेच नातेवाईक पहिल्यासारखे राहिले नाही हो आता…नव्याचे नऊ दिवस हो..वगैरे शेरे मारू लागले. ही आतून खूप दुखावली गेली. कंटाळून माहेरीच निघून आली आहे. हा संसार मला नको वाटतोय म्हणते.
नवरा, सासू सासरे, मुलं, नातेवाईक यांची सतत ऊठबस, चहापाणी, नाष्टा, जेवण यातच तिने पार गुरफटून घेतलं होतं. तसं पहायला गेलं तर सासरी त्रास नाही. नवराही चांगला आहे. सगळं छान आहे परंतु ही म्हणतेय मी पार कंटाळले आहे. तिनं तिचा तिचा मार्ग निवडायचा ठरवलंय. काल मी तिला विचारलं, अगं तुला घरच्यांची, नवऱयाची आठवण येत नाही का? मुलाला पहावंसं वाटतं नाही का? तर म्हणाली, हल्ली मला कसलाच फरक पडत नाही. कुणी सोबत नसलं तरीही काही वाटत नाही. दीड महिना ही इथे राहिली आहे. नुसती भटकते आहे पण तिला ना मुलांची आठवण ना नवऱयाची. मी म्हटलं तिला, अगं अचानक काय झालं तुझं? मी काही गोष्टी सांगत होते तेव्हा ऐकलं नाहीस. स्वतःसाठी वेळ दे, किती वेळा सांगितलं तुला, तर तेव्हा म्हणायचीस, काही गरज नाही. अगं हो. तेव्हा तसंच वाटायचं. पण आता मला माझा वेळ हवाय. माझी, माझी ‘स्पेस’ हवी आहे. तिला मी माझ्या परीनं खूप समजावून सांगितलं की स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे काय? ते का करायला हवं वगैरे..पण हिच्या डोक्मयात ते शिरतच नाही. मला अपेक्षित असलेली, मी सांगत असलेली स्पेस वेगळी. परंतु तिला हे कळत नाही की मी जे म्हणते ती ही स्पेस नाही. तिच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो आहे. अंतर वाढत आहे. मला हे काही ठीक वाटत नाही. म्हणून अधिक वेळ न घालवता तुमच्याकडे घेऊन आले. हल्ली हे फार पहायला मिळत आहे. माझा भाचा तोही असाच. काही वर्षे संसार केला. बायको म्हणेल ते आणि तसं असाच वागत राहिला. लग्न झाल्यावर हाच का तो असा प्रश्न पडावा इतका गुरफटला. आता म्हणतो मला माझी स्पेस हवीय. झालं..सगळं विस्कटायच्या मार्गावर आहे. बायकोला वाटतंय याचं प्रेम कमी झालं किंवा याचं दुसरीकडे अफेअर सुरू असेल. पण तसं काहीच नाही. काय करावं या मुलांचं काही समजत नाही.’
एक सजग आई नेमकी होणारी गल्लत कळल्याने मुलीला समुपदेशनासाठी घेऊन आली होती. रीमासोबत खूप वेळ चर्चा झाली. चांगुलपणाचे ओझे, तिची होणारी घुसमट, तिच्या मनातील स्पेस संदर्भातील गोंधळ, काय करणे गरजेचे आहे यावर चर्चा झाली आणि आलेली मानसिक मरगळ दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी, काही तंत्र आत्मसात करण्यासाठी रीमा तयारही झाली.
मुळातच अनेकदा रिमासारखी अनेकांची अशी होणारी गल्लत पहायला मिळते. विवाहाच्या अगदी सुरुवातीला वा वर्षानुवर्षे अनेक स्त्रिया नवऱयाच्या दिनक्रमाभोवती आपला दिनक्रम कसरतीने विणताना दिसतात. काही पुरुषांच्या बाबतीतही हे पहायला मिळते. ती म्हणेल तसं, त्या पद्धतीने तो किंवा ती अगदी पावलावर पाऊल ठेवून चालायचे. ‘मेड फॉर इच अदर’ दाखवण्याची अनेक जोडप्यांची धडपड पहायला मिळते. एकमेकांसाठी बदलणे, एकमेकांच्या आवडी निवडीना प्राधान्य देणे या गोष्टी आवश्यक आहेतच त्याबाबत दुमत नाही. परंतु ते किती आणि कसे? दुसऱयाच्या मताचा आदर राखत एकमेकांना ‘नाही’ म्हणण्याचे स्वातंत्र्य आणि त्याचा खुल्या दिलाने दोघेही स्वीकार करत आहेत का हेही महत्त्वाचे. नात्याचे संगोपन करताना त्याला मायेचे, प्रेमाचे, आपुलकीचे, तडजोडीचे सिंचन लागतेच! परंतु ते करत असताना विविध गोष्टींच्या स्वीकाराचा परिघ तुम्ही कसा आणि किती कौशल्याने आखत आहात हेही तितकेच महत्त्वाचे! नाहीतर मग सुरुवातीला काही वर्षे सारे छान असते. नंतर त्याने किंवा तिने थोडा वेळ स्वतःसाठी ठेवायला सुरुवात केली, काही बाबतीत ‘नाही’ म्हटले जाऊ लागले की फारच बदललीस तू/बदललास तू अशी सुरुवात आणि त्यावरून विकोपाला जाणारी असंख्य भांडणे पहायला मिळतात आणि नात्याचा प्रवास ‘अंतर’ वाढण्याच्या दिशेने होऊ लागतो. अगदी संसारात रमली हो ती असे म्हणणारे किंवा आदर्श सून आहे हो असे कौतुक करणाऱया नातेवाईकांच्या, लोकांच्या टीकेची ती धनी होऊ लागते. अर्थात हे पती पत्नी दोघांच्याही बाबतीत घडू शकते. म्हणून स्त्री काय किंवा पुरुष काय दोघांनीही हे लक्षात घ्यायला हवे की पत्नी, आई, मुलगी, सून, बहीण किंवा पती, बाबा, मुलगा, जावई, भाऊ या साऱया आपल्या भूमिका आहेत. त्या अवश्य नीट पार पाडाव्यात परंतु ते करत असताना स्वतःसाठी थोडा अवकाश काढायला हवा. त्या अवकाशामधे आपले आत्मभान, स्वविषयक जाणीव, विकास कसा होईल हे पहायला हवे. त्यावेळात आपली बलस्थाने, उणिवा कोणत्या याकडेही लक्ष द्यायला हवे. ज्या उणिवा असतील त्यावर कशा पद्धतीने काम करता येईल याचा विचार आणि तदनुसार कृती यावरही विचार व्हायला हवा. ‘स्पेस’ संदर्भात आपली गल्लत तर होत नाही ना हेही तपासायला हवे. स्पेस म्हणजे अंतर वाढणे नव्हे तर असा काढलेला ‘अवकाश’ वेळ की जिथे आपण स्वतःमध्ये डोकावून पहायला शिकू, आपल्या धारणा, मूल्य, जाणिवा याबाबत अधिकाधिक सजग होऊ.. अर्थात या ‘स्पेस’विषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात..
Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583