‘कमबॅक किंग’…रवींद्र जडेजा !
कपिल देवनंतर भारताला जबरदस्त अष्टपैलू खेळाडूची भासणारी उणीव बऱयापैकी भरून काढू शकणारा पर्याय म्हणजे रवींद्र जडेजा…एकदिवसीय सामन्यांत 150 बळी मिळविणारा पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज असलेल्या जडेजानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून पुन्हा एकदा धडाकेबाज पद्धतीनं पुनरागमन करताना आपण किती तारक नि भेदकही ठरू शकतो हे पुरेपूर सिद्ध केलंय…
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या चालू असलेल्या ब़ॉर्डर-गावस्कर चषक’ मालिकेतील पहिल्या कसोटीत सणसणीत विजय भारताला मिळविता आला तो प्रामुख्यानं तीन नावांमुळं…रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन नि रवींद्र जडेजा…आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात पुनरागमन करताना जडेजानं घेतलेल्या पाच बळींनी (लढतीत एकंदरित सात बळी) ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 177 धावांवर रोखण्यात सिंहाचा वाटा उचलला…गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमधील आशिया चषक स्पर्धेच्या दरम्यान ‘स्कायबोर्डिंग’ करताना रवींद्र जडेजाच्या घोटय़ाला दुखापत झाल्यानं त्याला उर्वरित सामने तसंच यंदाच्या श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध स्वगृही झालेल्या मालिकांवर देखील पाणी सोडावं लागलं. रणजी चषक स्पर्धेत सौराष्ट्रच्या संघाचं नेतृत्व करताना तंदुरुस्ती सिद्ध केल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघात स्थान मिळालं…
पुनरागमन केल्यानंतर या अष्टपैलू खेळाडूनं झटपट प्रभाव पाडलाय. पण संघातून बाहेर फेकले गेल्यानंतर किंवा दुखापत झाल्यानंतर त्यानं पुन्हा जबरदस्त उसळी घेण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे…रवींद्र जडेजानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं ते कोलंबोत श्रीलंकेविरुद्ध 2009 साली. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी तो 35 एकदिवसीय सामने खेळला. परंतु क्रिकेटच्या महाकुंभासाठीच्या संघात तो स्थान मिळवू शकला नाही. जडेजानं मग एकदिवसीय संघात पुनरागमन केलं ते 2011 मधील इंग्लंडमध्ये झालेल्या मालिकेतून…
तिसऱया लढतीत त्याला खेळविण्यात आलं आणि रवींद्र जडेजानं 78 धावा काढताना आपण कसे ‘गेम चेंजर’ आहोत ते सिद्ध केलं. त्या सामन्यात भारताची 5 बाद 58 अशी अवस्था झाली होती, परंतु जडेजा आणि एम. एस. धोनी यांच्या अर्धशतकांमुळं संघाला 50 षटकांत 7 बाद 234 पर्यंत मजल मारता आली. त्यानं नंतर प्रभावी गोलंदाजी करताना 42 धावा देऊन दोन बळीही टिपले. इंग्लंडनं ‘डकवर्थ-लुईस’ पद्धतीच्या जोरावर हा सामना जिंकला ती गोष्ट वेगळी…
रवींद्र जडेजा कारकिर्दीतील पहिली कसोटी खेळला तो इंग्लंडविरुद्ध नागपूर इथं 2012 मध्ये. 2014 पर्यंत त्याच्या नावावर 12 लढती जमा झाल्या. परंतु 2014 मधील इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खराब कामगिरीनंतर त्याला संघातील स्थान गमवावं लागलं. पुढच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीसाठी त्याचा विचार केला गेला नाही. त्यानंतर लगेच त्याच्या खांद्याला दुखापत होऊन 2015 मधील बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्धचे कसोटी सामनेही हुकले. जडेजानं त्याच वर्षी कसोटी संघात पुनरागमन केलं ते दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय भूमीत झालेल्या मालिकेतून अन् त्यानं पहिल्याच कसोटीत शानदार कामगिरी करताना घेतलेल्या एकूण आठ बळींच्या जोरावर भारतानं 108 धावांनी दणदणीत विजय मिळवला…
रवींद्र जडेजाला 2021 च्या उत्तरार्धातही गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळं न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱया कसोटीत त्याला खेळता आलं नाही, शिवाय दक्षिण आफ्रिकेतील मालिकेलाही मुकावं लागलं. परंतु गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीवेळी तो भारतीय संघात परतला अन्. पंजाबमधील आय. एस. बिंद्रा पीसीए स्टेडियमवर त्यानं कारकिर्दीतील 175 धावांची सर्वोत्तम खेळी नोंदविताना भारताला एक डाव नि 222 धावांनी विजय सुद्धा मिळवून दिला…रवींद्र जडेजाला आजवर तारत आलीय ती हीच ‘जिगर’, हेच ‘फायटिंग स्पिरीट’ !
दिग्गज अष्टपैलू खेळाडूंहून सरस…
- रवींद्र जडेजानं कसोटीत 37.04 च्या सरासरीनं जमविल्याहेत 2593 धावा. 2019 पासूनचा विचार करता त्याची सरासरी कसोटी क्रिकेटमध्ये आठवी (31 डावांत 49.37), तर भारतीय फलंदाजांमध्ये रोहित शर्मानंतर (57.65) दुसरी सर्वोत्तम…उत्कृष्ट सरासरी असलेल्या पहिल्या 10 फलंदाजांपैकी एकही जडेजाइतका खाली फलंदाजीला येत नाही हा महत्त्वाचा फरक…
- जडेजाची फलंदाजीतील एकूण सरासरी इयान बॉथम, कपिल देव, रिचर्ड हॅडली, अँड्रय़ू फ्लिंटॉफ आणि शॉन पोलॉक या दिग्गज अष्टैलू खेळाडूंपेक्षा चांगली, तर इम्रान खानपेक्षा काही दशांशच कमी. अर्थात ते सारे वेगवान गोलंदाज असले, तरीही जडेजा देखील काही कमी प्रभावी नव्हे…
- सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांमध्ये जडेजाचं स्थान 41 वं, तर 2000 पेक्षा जास्त धावा करणाऱया आणि 200 पेक्षा जास्त बळी घेणाऱयांमध्ये क्रमांक 17 वा…फक्त जॅक कॅलिस, गॅरी सोबर्स आणि इम्रान यांची फलंदाजीतील सरासरी, तर इम्रान, हॅडली आणि पोलॉक यांची गोलंदाजीतील सरासरी त्याच्याहून चांगली…
भरपेट नाश्ता…दुपारच्या जेवणाला फाटा !
- रवींद्र जडेजाला गुजराती पाककृती खूप आवडतात, तरीही तो त्याच्या नियमित आहारात ‘फॅट’, ‘कार्बोहायड्रेट्स’ आणि उच्च-कॅलरीयुक्त जेवण टाळण्याचा प्रयत्न करतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जडेजा पोटभर नाश्ता घेतल्यावर सहसा दुपारच्या जेवणाला फाटा देतो अन् रात्रीच्या जेवणात पौष्टिक नि संतुलित आहार असेल याकडे कटाक्ष ठेवतो, तर मधल्या काळात दूध व फळांचं सेवन…
- जडेजा हा दर्दी खवय्या म्हणून विख्यात आणि राजकोटमध्ये त्यानं स्वतःचं ‘जड्डूज फूड फिल्ड’ हे उपाहारगृह देखील उघडलंय. त्याच्या बहिणीनं दिलेल्या माहितीनुसार, त्याला घरी बनवलेलं ’काठियावाडी’ जेवण तसंच पंजाबी जेवण देखील आवडतं अन् ’दाल मखनी’ हा त्याच्या आवडत्या पदार्थांपैकी एक…जडेजा आपल्या आहारात तेलकट आणि स्निग्ध पदार्थ टाळतो…
थेडक्यात रवींद्र जडेजा…
6 डिसेंबर, 1988 रोजी गुजरातच्या जामनगर जिल्हय़ातील नवागम घेड या नगरात जन्मलेल्या रवींद्रसिंह अनिरुद्धसिंह जडेजाचे वडील हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे. त्यांना मुलानं लष्करात जावं असं वाटायचं, पण जडेजा पोहोचला क्रिकेटच्या मैदानात. त्याची बहीण परिचारिका, तर पत्नी रिवाबा गतवर्षी भाजपच्या तिकिटावर उत्तर जामनगरमधून आमदार म्हणून निवडून आलीय…‘चेन्न्ई सुपरकिंग्स’मधून खेळणाऱया या खेळाडूला धोनीनं ‘सर रवींद्र जडेजा’ हे टोपण नाव दिलेलं असलं, तरी त्याला ‘बापू’ म्हटलेलं जास्त आवडतं.
भारताच्या कसोटी विजयांत अश्विन व जडेजाची करामत…
नाव | कसोटी | बळी | सरासरी | सर्वोत्तम | 5 बळी | 10 बळी |
अश्विन | 33 | 207 | 19.24 | 59 धावांत 7 बळी | 18 | 5 |
जाडेजा | 33 | 164 | 19.57 | 48 धावांत 7 बळी | 9 | 1 |
फलदांजीतील कामगिरी…
प्रकार | सामने | डाव | नाबाद | धावा | सर्वोच्च | सरासरी | स्ट्राईक रेट | शतकं | अर्धशतकं |
कसोटी | 61 | 90 | 20 | 2593 | नाबाद 175 | 37.04 | 58.59 | 3 | 18 |
वनडे | 171 | 115 | 40 | 2447 | 87 | 32.62 | 86.52 | – | 13 |
टी20 | 64 | 34 | 15 | 457 | नाबाद 46 | 24.05 | 124.52 | – | – |
गोलंदाजीतील पराक्रम…
प्रकार | सामने | डाव | बळी | डावात सर्वोत्तम | सामन्यात सर्वोत्तम | सरासरी |
कसोटी | 61 | 116 | 249 | 48 धावांत 7 बळी | 154 धावांत 10 बळी | 24.34 |
वनडे | 171 | 166 | 189 | 36 धावांत 5 बळी | – | 37.36 |
टी20 | 64 | 62 | 51 | 15 धावांत 3 बळी | – | 28.49 |
खेळ जुनाच, ओळख नवी… : बिलियर्ड्स
बिलियर्ड्स म्हणजेच ‘इंग्लिश बिलियर्ड्स’ हा केवळ इंग्लंडमध्येच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे. याचं कारण ब्रिटिश साम्राज्याच्या काळात झालेला प्रसार…बिलियर्ड्स हा एक ‘क्यू स्पोर्ट’ म्हणजे काठीने चेंडू ढकलण्याचा खेळ असून त्यात एक ‘ऑब्जेक्ट बॉल’ (लाल रंगाचा) नि दोन ‘क्यू बॉल’ (पिवळय़ा व पांढऱया रंगाचे) वापरले जातात…
- जगभरात बिलियर्ड्सचे अनेक प्रकार असले, तरी ‘इंग्लिश बिलियर्ड्स’ हा त्यातील सर्वांत लोकप्रिय आहे. इंग्लंडमध्ये उगम झालेला हा खेळ म्हणजे ‘कॅरमबोल गेम’सह विविध खेळांचे एकत्रीकरण आहे. गेल्या 30 वर्षांत ‘स्नूकर’मुळे त्याची लोकप्रियता कमी झाली आहे…
- बिलियर्ड्समध्ये प्रत्येक खेळाडू वेगळ्या रंगाचा ‘क्यू बॉल’ वापरतो आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा अधिक गुण मिळवण्याचा तसंच सामना जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या अन् आधी मान्य केलेल्या एकूण गुणसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो (बहुतेक करून 300)…
- इंग्लिश बिलियर्ड्स एक विरुद्ध एक किंवा दोन विरुद्ध दोन खेळाडू अशा प्रकारे खेळला जाऊ शकतो, पण सर्वांत लोकप्रिय आहे ती त्याची एकेरी आवृत्ती. हा खेळ स्नूकर टेबलप्रमाणेच आकारमान (3569 मिलीमीटऱƒ1778 मिलीमीटर) असलेल्या टेबलवर खेळला जातो. हे टेबल लाकडी किंवा सिंथेटिक साहित्यापासून बनविलं जातं…
- त्यात तीन चेंडू वापरले जातात-लाल, पिवळा आणि पांढरा. प्रत्येकाचा आकार 52.5 मिलीमीटरांचा असतो…खेळाडूंकडे प्रत्येकी एक ‘क्यू’ म्हणजे चेंडू ढकलण्यासाठी काठी असते जी लाकूड किंवा फायबर ग्लासपासून बनविली जाते आणि ती 100 ते 150 सेंटीमीटर लांबीची असते..
- गुण मिळविण्यासाठी त्यात विविध प्रकार असून त्यापैकी ‘कॅनन’मध्ये ‘क्यू बॉल’ अशा रीतीने ढकलला जातो की, तो लाल आणि अन्य ‘क्यू बॉल’लाही थडकतो (कोणत्याही क्रमाने). यामुळे दोन गुण मिळतात…
- ‘पॉट’मध्ये ‘क्यू बॉल’ थडकून लाल चेंडू ‘पॉकेट’मध्ये गेल्यानंतर तीन गुण मिळतात. जर ढकललेला ‘क्यू बॉल’ दुसऱया ‘क्यू बॉल’वर आदळून तो ‘पॉकेट’मध्ये गेला, तर दोन गुण मिळतात…
- इन-ऑफ’ हे जेव्हा ढकललेला ‘क्यू बॉल’ दुसऱया चेंडूवर आदळून पॉकेटमध्ये जातो तेव्हा घडतं. तो प्रथम लाल चेंडूवर आदळल्यास तीन गुण आणि दुसऱया खेळाडूच्या ‘क्यू बॉल’वर प्रथम आदळल्यास दोन गुण मिळतात…यापैकी एकहून अधिक गोष्टी एकाच ‘शॉट’मध्ये साध्य केल्या जाऊ शकतात. प्रत्येक ‘शॉट’वर जास्तीत जास्त 10 गुण मिळू शकतात. हा रणनीतीचा कस पाहणारा खेळ असून आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या पुढे राहण्यासाठी भरपूर कौशल्य आवश्यक असतं…
– राजू प्रभू
हैदराबादमध्ये ई वर्ल्ड चॅम्पियनशिपचा बोलबाला
दोनच दिवसापूर्वी हैदराबादमध्ये ई वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जगभरातील 11 नामवंत संघ सहभागी झाले होते. हैदराबादमधील हुसेन सागर तलावाशेजारी खास ई पिक्स रेस ट्रॅक तयार करण्यात आला. 2.8 किमीच्या 18 वळणे असलेल्या या स्पर्धेचे जेतेपद डीएस पेसच्या अनुभवी जीन एरिक व्हर्गेनने पटकावले. ब्रुम…ब्रुम….ब्रुम असा आवाज करत तब्बल वीस हजारहून चाहत्यांच्या उपस्थित भारतात झालेली ही फॉर्म्यूला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप चांगलीच भाव खाऊन गेली.
विशेष म्हणजे, देशात प्रथमच इलेक्ट्रिक कारची फॉर्म्युला ई रेस पार पडली. पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणे आणि ई-वाहनाला प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. ई वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जगभरातील 11 संघांनी सहभागी नोंदवला. ज्यामध्ये महिंद्रा व जग्वार हे दोन संघ भारतीय होते. यापूर्वी 2012-13 मध्ये ग्रेटर नोएडामध्ये फॉर्म्युला वन शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर तब्बल दहा वर्षानंतर भारताला या इलेक्ट्रिक कारच्या आयोजनाचे यजमानपद मिळाले. देशातील प्रमुख शहर असलेल्या हैदराबाद शहरानेही तोडीस तोड आयोजन करत उपस्थितांची मने जिंकली. एकापेक्षा एक अशा वेगवान इलेक्ट्रिक कार्स, त्यांचा भन्नाट वेग, अनुभवी ड्रायव्हरांचे कौशल्य यामुळे या स्पर्धेचा चांगलाच बोलबाला दिसून आला.
स्पर्धेचे स्वरुप आणि रेसिंग ट्रॅक
फॉर्म्युला ई आणि इतर कोणत्याही मोटरस्पोर्टमधील प्रमुख फरक म्हणजे कार. या स्पर्धेसाठी सर्व कार इलेक्ट्रिक होत्या. या सर्व कार्स 250क्sं बॅटरीने धावणार आहे. या बॅटरीची क्षमतेने गाडी 280क्स्/प् वेगाने धावू शकते. तसेच या वेगामुळे कारच्या आवाजाची पातळी फक्त 80 डेसिबलपर्यंत पोहोचते. फॉर्म्युला ं मधील ं म्हणजे इलेक्ट्रिक असा आहे. तर फॉर्म्युला 1 ही स्पर्धा इंधनावर धावणाऱ्या गाड्यांना समर्थित करते. फॉर्म्युला ं वर्ल्ड चॅम्पियनशिप संपूर्णपणे कार बॅटरीद्वारे समर्थित आहे. जगातील 11 संघ आणि 22 ड्रायव्हर्स सहभागी झाले होते. नामवंत अशा पोर्शे, जग्वार, निसान आणि महिंद्रा या ब्रँडच्या गाड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या.
महिंद्राची वेगवान इलेक्ट्रिक हाइपर कार
हैद्राबादमध्ये झालेल्या या मोटार शोमध्ये जगातली सगळ्यात वेगवान प्योर-इलेक्ट्रिक हाइपर जीटी ‘बतिस्ता‘ कार महिंद्राने आणली. विशेष म्हणजे, महिंद्राने आणलेली ही सगळ्यात वेगवान इलेक्ट्रिक हाइपर कार आहे. या कारची निर्मिती महिंद्राच्या ऑटोमोबाइल पिनिनफेरिनाने केली आहे. ही कार फक्त 1.86 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठते. कारला 0 ते 200 किमी/ताशी वेग गाठण्यासाठी फक्त 4.75 सेकंद लागतात. वाहन बनवणारी कंपनीने स्टॅबिलिटी आणि ब्रेकिंगवर अधिक काम केले आहे.
तब्बल 18 कोटींची किंमत असलेली ही कार चालवण्याचा मोह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही आवरला नाही. सचिननेही या रेसटॅकवर या कारची राईड घेतली. हैदराबादमधील या स्पर्धेसाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेता रामचरण, उद्योगपती आनंद महिंद्र यांच्यासह दिग्गज उपस्थित होते. यावेळी सचिन व रामचरण यांनी महिंद्राची ही वेगवान कार चालवली. सोशल मीडियावर या राईचे फोटो मोठया प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.
जग इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत असताना स्पर्धेतही बदल होताना दिसत आहे. इलेक्ट्रिक गाड्यांची जबरदस्त फिचर्स, कमी सेंकदात गाठत असलेला तुफानी वेग, नवे तंत्रज्ञान यामुळे भविष्यात फॉर्म्युला वन शर्यतीला ही ई वर्ल्ड चॅम्पियनशिप नक्कीच टक्कर देणार आहे.
विनायक भोसले, कोल्हापूर