पाकिस्तानातील भागात जन्म तसेच कुटुंब तेथे राहत असूनही केवळ हिंदुस्थानच्या प्रेमापोटी स्वतःचे सर्वस्व त्यागणाऱया मेजर जनरल शाहनवाज खान यांच्याविषयी देशाने कृतज्ञ असणे आवश्यक आहे. 9 डिसेंबर हा दिवस आझाद हिंद फौजेमधील मेजर जनरल शाहनवाज खान यांचा जन्मदिवस. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूची चौकशी करणाऱया पहिल्या आयोगाचे ते अध्यक्ष होते. भारत सरकारमध्ये शाहनवाज खान मंत्री झाले असता त्यांचा पुत्र पाकिस्तानी सैन्यात मोठा अधिकारी असल्याने वादही झाला.
मेरठ लोकसभा मतदारसंघातून चारवेळा मोठय़ा मताधिक्याने विजयी होणारा एक नेता आझाद हिंद सेनेचा मोठा अधिकारीही होता. या अधिकाऱयाचे नाव होते शाहनवाज खान. तेच नंतर भारतीय राजकारणातील मोठे चेहरे ठरले, मंत्रीही झाले. 1952 मध्ये मेरठमधील शाहनवाज यांनी पहिली निवडणूक जिंकली तेव्हा त्यांचे कुटुंब आणि पुत्र पाकिस्तानात होते. शाहनवाज यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानातून भारतात येण्यास स्पष्ट नकार दिला होता.
भारतावरील प्रेम
1952 च्या निवडणुकीत मेरठच्या जनतेने आझाद हिंद सेनेच्या या मोठय़ा सेनानीला भरघोस प्रतिसाद दिला होता या नेत्याने पाकिस्तानऐवजी भारतात राहण्याचा निर्णय स्वतःच्या कुटुंबीयांनाही प्रसंगी दूर सारून घेतला होता. शाहनवाज राजकारणात दाखल झाले त्याच काळात त्यांचा मुलगा पाकिस्तानी सैन्यात भरती झला. शाहनवाज यांनी भारतीय राजकारणाचा प्रभाव निर्माण केला, तर त्यांच्या मुलाने पाकिस्तानी सैन्यात बढती मिळविली होती. काही वर्षांनी शाहनवाज भारत सरकारमध्ये मंत्री झाले तर त्यांचा मुलगा पाकिस्तानी सैन्यात मोठा अधिकारी झाला.
नेताजी बोस यांचे सहकारी
शाहनवाज हे पाकिस्तानच्या (तत्कालीन अखंड भारत) रावळपिंडी जिल्हय़ातील मटोर गावात जन्मले होते. त्यांचे शिक्षणही तेथेच झाले. पुढील काळात ब्रिटिश सैन्यात ते कॅप्टन झाले. परंतु नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत दाखल होताच ते चर्चेत आले. नेताजींच्या जवळच्या लोकांपैकी एक असलेले शाहनवाज हे आझाद हिंद सैन्यात मेजर जनरल होते. आझाद हिंद सेनेने समर्पण केल्यावर ब्रिटिश सैन्याने त्यांना पकडून लाल किल्ल्यात डांबले होते. प्रसिद्ध लाल किल्ला कोर्ट मार्शल झाले असता जवाहरलाल नेहरू यांनी त्यांची बाजू मांडली होती. स्वतंत्र भारतात लाल किल्ल्यावरुन ब्रिटिश साम्राज्याचा ध्वज उतरवून तिरंगा फडकविणारे जनरल शाहनवाजच होते. आजही लाल किल्ल्यात प्रतिदिन संध्याकाळी 6 वाजता लाइट अँड साउंडचा जो कार्यक्रम होतो, त्यात नेताजींसह शाहनवाज यांचाही आवाज ऐकू येतो. शाहनवाज यांचे पूर्ण कुटुंब रावळपिंडीतच राहत होते. त्यांना तीन मुलगे आणि तीन मुली होत्या. स्वातंत्र्यावेळी देशाची फाळणी झाली तेव्हा ते हिंदुस्थानच्या प्रेमापोटी येथे पोहोचले. परंतु त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत आले नाही. ते केवळ एका पुत्रासोबत भारतात आले. नेहरूंनी त्यांना स्वतःच्या मंत्रिमंडळात स्थान दिले. शाहनवाज दीर्घकाळापर्यंत केंद्रीय मंत्री राहिले. 1956 मध्ये भारत सरकारने नेताजी बोस यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एक आयोग स्थापन केला होता, याचे अध्यक्षही जनरल शाहनवाज हेच हेते.
1965 चे युद्ध अन् शाहनवाज
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1965 मध्ये युद्ध सुरू असताना शाहनवाज हे लालबहादूर शास्त्री यांच्या सरकारमध्ये कृषिमंत्री होते. त्यांचा मुलगा पाकिस्तानी सैन्याकडून लढत असल्याचे वृत्त अचानक फैलावू लागले. महमूद नवाज अली हा त्यांचा पुत्र पाकिस्तानी सैन्याकडून लढत होता. विरोधकांनी याप्रकरणी शाहनवाज यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. चहुबाजूने होत असलेल्या टीकेने व्यथित शाहनवाज यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पंतप्रधान शास्त्री यांनी शाहनवाज यांचा बचाव करत त्यांचा राजीनामा स्वीकारण्यासही नकार दिला होता. त्यांचा मुलगा शत्रूच्या सैन्यात मोठा अधिकारी असल्यास शाहनवाज यांची काय चूक असे शास्त्री यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले होते. तसेही आजदेखील शाहनवाज यांच्या कुटुंबातील लोक पाकिस्तानात मोठी पदे भूषवित आहेत.
पुत्र पाकिस्तानी सैन्यात
पाकिस्तानी सैन्यात कार्यरत असेपर्यंत महमूद नवाज हे स्वतःच्या वडिलांना कधीच भेटू शकले नाहीत, परंतु निवृत्तीनंतर ते वडिलांना भेटण्यासाठी भारतात आले होते. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे प्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल जहीर उल इस्लाम हे शाहनवाज यांचे भाचे होते. शाहनवाज यांचे बंधू पाकिस्तानी सैन्यात ब्रिगेडियर पदापर्यंत पोहोचले होते.
महान देशभक्त
शाहनवाज यांचे वयाच्या 69 व्या वर्षी नवी दिल्लीत 1983 साली निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापन जनरल शाहनवाज मेमोरियल फौंडेशन गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करत आहे. या फौंडेशनचे मुख्यालय नवी दिल्लीच्या जामिया मिलिया भागात आहे. देशाला पारतंत्र्याच्या बेडय़ांपासून मुक्त करविण्यासाठी लाखो देशभक्त आणि सैनिकांनी प्राणाहुती दिली आहे. या महान देशभक्तांमध्ये जनरल शाहनवाज खान यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. एक सच्चा आणि शूर सैनिकासह जनरल खान हे एक खऱया अर्थाने समाजसेवक आणि द्रष्टे राजकारणी होते.
आझाद हिंद सेनेतील पार्श्वभूमी
शाहनवाज ब्रिटिश सैन्यात सामील झाले तेव्हा महायुद्ध सुरू होते आणि त्यांना सिंगापूरमध्ये तैनात करण्यात आले होते. जपानी सैन्याने ब्रिटिश इंडियन आर्मीच्या शेकडो सैनिकांना युद्धकैदी करून तुरुंगात डांबले होते. 1943 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस सिंगापूरमध्ये आले आणि त्यांनी आझाद हिंद फौजेच्या मदतीने या कैदी सैनिकांची मुक्तता करविली होती. नेताजींची ओजस्वी वाणी आणि ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ या नाऱयामुळे प्रभावित होत शाहनवाज यांच्यासह शेकडो सैनिक आझाद हिंद सेनेत सामील झाले आणि त्यांनी भारतमातेच्या मुक्तीसाठी इंग्रजांशी लढा दिला. शाहनवाज खान यांची देशभक्ती आणि नेतृत्वक्षमतेने प्रभावित नेताजींनी त्यांना आरजी हुकूमत-ए-आझाद हिंदच्या मंत्रिमंडळात सामील केले होते.
ब्रिटिशांच्या विरोधात लढा
डिसेंबर 1944 मध्ये जनरल शाहनवाज यांना नेताजीनीं मांडले येथे तैनात सैन्याच्या तुकडीचा क्रमांक एकचा कमांडर नियुक्त केले होते. सप्टेंबर 1945 मध्ये नेताजींनी आझाद हिंद सेनेच्या निवडक सैनिकांची सुभाष ब्रिगेड स्थापन केली हाती. याचे नेतृत्व नेताजींनी जनरल शाहनवाज यांनाच सोपविले होते. या ब्रिगेडने कोहिमामध्ये इंग्रजांच्या विरोधात लढा दिला होता. संयुक्त सैन्याच्या सेकंड डिव्हिजनचा कमांडर म्हणून त्यांना ब्रह्मदेशातही पाठविण्यात आले होते. ब्रह्मदेशात जनरल शाहनवाज आणि त्यांच्या पथकाने ब्रिटिश सैन्याला कैद केले होते. नोव्हेंबर 1946 मध्ये शाहनवाज, कर्नल प्रेम सहगल आणि कर्नल गुरुबक्ष सिंग यांच्या विरोधात दिल्लीच्या लाल किल्ल्यात इंग्रजांनी राजद्रोहाचा खटला चालविला. परंतु जनतेचा प्रचंड दबाव आणि समर्थनामुळे इच्छा नसतानाही ब्रिटिशांना आझाद हिंदा सेनेच्या अधिकाऱयांना आर्थिक दंड ठोठावून सोडावे लागले हेते. शाहनवाज आणि उर्वरित अधिकाऱयांच्या वतीने सर तेजबहादुर सप्रू, जवाहरलाल नेहरू, आसफ अली, बुलाभाई देसाई आणि कैलासनाथ काटजू यांनी युक्तिवाद मांडला होता.
काँग्रेसमध्ये सामील
1946 मध्ये आझाद हिंद सेनेचे अस्तित्व संपुष्टात आल्यावर जनरल शाहनवाज हे महात्मा गांधी आणि नेहरू यांच्या प्रेरणेमुळे इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये सामील झाले होते. 1947 मध्ये पंतप्रधान नेहरूंनी जनरल शाहनवाज यांना काँग्रेस सेवा दलाच्या सदस्यांना सैनिकांप्रमाणे प्रशिक्षण आणि शिस्त शिकविण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविली. जनरल खान यांना काँग्रेस सेवा दलाच्या सेवापतिपदाने गौरविण्यात आले. हे पद त्यांनी 1951 पर्यंत भूषविले. 1977-83 पर्यंत ते काँग्रेस सेवा दलाचे प्रभारी होते.
केंद्रात महत्त्वाची पदे अन् जबाबदारी
1952 मध्ये पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी मेरठ येथून विजय मिळविला, त्यानंतर 1957, 1962 आणि 1972 मध्येही यश मिळविले होते. शाहनवाज हे 23 वर्षे केंद्रीय मंत्री राहिले. 1952 मध्ये विजयी झाल्यावर संसदीय सचिव आणि रेल्वेराज्यमंत्री झाले, 1957-64 पर्यंत केंद्रीय खाद्य तसेच कृषिमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. 1965 मध्ये कृषिमंत्री तर 1966 मध्ये श्रम, रोजगार तसेच पुनर्वसन मंत्रालयाची धुरी त्यांनी समर्थपणे पेलली. 1971-75 पर्यंत पेट्रोलियम तसेच रसायन आणि कृषि अन् सिंचन मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. मेरठसारख्या संवेदनशील शहराचे दोन दशकांपासून अधिक काळ प्रतिनिधित्व जनरल खान यांनी केले. त्यांचे कुशल नेतृत्व तसेच सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती यामुळे शहरात कधीच दंगल झाली नाही.
1956 मध्ये केंद्र सरकारने नेताजींच्या मृत्यूची कारणे तसेच स्थितीचा खुलासा करण्यासाठी एक आयोग स्थापन केला होता. या आयोगाचे अध्यक्ष जनरल शाहनवाज हेच होते. स्वतंत्र भारतात लाल किल्ल्यावरील युनियन जॅक खाली उतरवून तिरंगा फडकविणारे जनरल शाहनवाजच होते. शाहनवाज यांची देशाबद्दलची निष्ठा तसेच देशउभारणीतील भूमिका पाहता त्यांना भारतरत्न देण्याची मागणी सेवानिवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केली होती. पोस्ट विभागाने महान स्वातंत्र्यसेनानी जनरल शाहनवाज खान, कर्नल प्रेमचंद आणि कर्नल गुरुबक्ष यांच्या गौरवार्थ टपाल तिकीट सादर केले होते.
शाहरुख खान याच्याशी संबंध
9 डिसेंबर 1983 रोजी शाहनवाज यांची जीवनयात्रा संपुष्टात आली होती. इंदिरा गांधी यांच्या सूचनेनुसार राजीव गांधी यांनी खान यांच्या अंत्ययात्रेत भाग घेतला होता. खान यांच्या परिवारात त्यांचे तीन पुत्र महमूद नवाज, अकबर नवाज, अजमल नवाज आणि तीन कन्या मुमताज, फहमिदा आणि लतीफ फातिमा आहेत. लतीफ फातिमा यांना शाहनवाज यांनी दत्तक घेतले होते. लतीफ फातिमा या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांच्या मातोश्री आहेत.