येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्याला 73 वर्षं पूर्ण होत आहेत.स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दोन शब्द लिहिताना, देशोदेशीच्या स्वातंत्र्य चळवळींमधील स्त्रियांचे योगदान अर्थातच विसरून चालणार नाही. प्रत्येक देशातच मोजके देशप्रेमी लोक देशहितासाठी धडपडत असतात.
पंधराव्या शतकातील फ्रान्समधील थोर संत व योद्धा अशी जोन ऑफ आर्क म्हणजे प्रखर राष्ट्रनि÷sचे प्रतीकच. एका सामान्य शेतकऱयाच्या कुटुंबात जोनचा जन्म 1412 साली झाला. 1428 साली इंग्रजांनी ओर्लेआँला वेढा घातला. या शहरावरील विजयामुळे फ्रान्सचा बहुतांश भाग इंग्रजांच्या वर्चस्वाखाली येणार होता. तेव्हा अवघ्या 17 वर्षांच्या जोनने योद्ध्याचा पोशाख परिधान करून आणि घोडय़ावर स्वार होऊन, हाती ध्वज व तलवार घेऊन, प्रेंच सैन्याचे नेतृत्व केले. या युद्धात एका क्षणी जोन बाण लागल्याने घायाळ झाली होती. तिच्या सैन्याचे मनोधैर्य खचू लागले होते. पण जोनने स्वतःच्या हाताने तो बाण खेचून काढला आणि पुन्हा चढाई करून आपल्या सैन्याचे मनोबल उंचावले. मात्र पॅरिसच्या लढाईत तिची पीछेहाट झाली. बर्गेंडीच्या डय़ूकने तिला पकडून इंग्रजांच्या हवाली केले. त्यानंतर तिच्यावर खोटेनाटे आरोप ठेवून, 30 मे 1431 रोजी तिला जाहीररीत्या जाळण्यात आले. मात्र प्रेंच राज्यक्रांतीच्या काळातही जोन ऑफ आर्कचा प्रखर राष्ट्रवाद लोकांना प्रेरणा देत राहिला.
1854 साली डलहौसीने फतवा काढून झाशी संस्थान ब्रिटिश राज्यात विलीन करण्याचा निर्णय घेतला. राणीला पाच हजार रु. तनखा दिला जाणार होता. राणीने काही दिवस ब्रिटिश अंमल स्वीकारला. परंतु तिच्या मनात खळबळ होती. अवधचा नवाब, बहादूरशाह, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे प्रभृतींशी चर्चा करून राणीने उठाव करण्याचे ठरवले. 10 मे 1857 रोजी मंगल पांडेने मेरठला उठाव केला तर जून 1857 ते मार्च 1858 पर्यंत राणीने झाशीतले इंग्रजांचे वर्चस्व उलथवून सत्तासूत्रे आपल्या ताब्यात घेतली. 20 मार्च 1858 रोजी सर व्हय़ू रोजने झाशीच्या किल्ल्याला वेढा घातला. फंदफितुरी आणि अपुरी तटबंदी यामुळे किल्ला लढवणे कठीण होऊ लागले. किल्ला इंग्रजांच्या ताब्यात जातो आहे, हे बघून राणीने आपला दत्तक मुलगा दामोदरला पाठीशी बांधले आणि सैन्याची फळी फोडली. शेवटी घोडय़ावर बसून, 102 मैलांचा प्रवास करून राणी काल्पीला गेली. तिथून तिने ग्वाल्हेरच्या किल्ल्यात आश्रय घेतला. त्यालाही गोऱयांनी वेढा दिला. अखेर त्यांच्याशी झुंज देत राणी लक्ष्मीबाईने रणांगणावर देह ठेवला.
जन्माने ब्रिटिश असूनही, ऍनी बेझंट यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतला. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषवले. त्यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्या समाजवादी विचारांच्या होत्या. 1875 साली चार्ल्स ब्रॅडलाफ या समाजवादी विचारवंताबरोबर त्यांनी कुटुंब नियोजनावर ‘द प्रुट्स ऑफ फिलॉसॉफी’ हा प्रबंध लिहिला. या लिखाणामुळे दोघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. अपिलात ती रद्द झाली. ऍनी भारतात आल्या त्या 1893 साली, थिऑसॉफिकल सोसायटीच्या कामासाठी आणि मग हेच त्यांचे घर बनले. त्यांनी दक्षिण भारतात सामाजिक चळवळी केल्या. स्त्रियांना पुरुषांबरोबरची, समान वागणूक मिळावी, जमीनविषयक कायद्यात सुधारणा घडाव्यात, यासाठी त्यांनी आग्रह धरला. उत्तम दर्जाची घरबांधणी, गोरगरीब मुलांना शाळेतच मोफत जेवण, बालविवाह, जातिभेद यांना विरोध अशा मुद्यांवर प्रचार करून त्यांनी लोकजागृती केली.
बनारस हिंदू विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांनी पं. मदनमोहन मालवीय यांना मदत केली. ‘कॉमन विल’ हे साप्ताहिक आणि ‘न्यू इंडिया’ हे दैनिक त्यांनी सुरू केले. 1914 साली त्या काँग्रेसमध्ये सामील झाल्या आणि जहाल व मवाळ यांच्यात एकी घडवून आणण्याची धडपडही त्यांनी केली. बेझंटबाईंच्या मनातील होमरूल चळवळीची कल्पना आणि आयर्लंडमध्ये असलेल्या होमरूलच्या धर्तीवर भारतात शासनव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याची टिळकांची इच्छा यात साम्य होते. ऍनी बेझंट यांना टिळकांची मदत होमरूल चळवळीसाठी हवी होती आणि टिळक पुन्हा काँग्रेसमध्ये आले, तर चळवळीत पुन्हा प्राण संचारेल, हेही त्यांना दिसत होते. ऍनी बेझंट 1914 साली पुण्यात आल्या व गोखले व टिळक यांना भेटल्या होत्या.
सरोजिनी नायडू
त्यांच्याप्रमाणे सरोजिनी नायडू यांचेही स्वातंत्र्य चळवळीतील योगदान मोठे आहे. हैदराबादमधील बंगाली कुटुंबात त्यांचा जन्म झाला. इंग्लंडहून आल्यानंतर त्यांनी महात्मा गांधींच्या स्वराज्यप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. 1905 साली वंगभंगाविरुद्धच्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्या नामदार गोखले, रवींद्रनाथ ठाकूर, महात्मा गांधी प्रभृतींना भेटल्या. 1915-18 या काळात सरोजिनी यांनी समाजकल्याण, स्त्रीदास्य मुक्ती व राष्ट्रवाद याविषयी देशभर
प्रबोधनकार्य सुरू केले. विमेन्स इंडियन असोसिएशनच्या स्थापनेत त्या सामील होत्या. होमरूल चळवळीच्या कामासाठी त्या लंडनलाही गेल्या. तिथे भारतीय स्वातंत्र्याची मागणी त्यांनी लावून धरली. परतल्यानंतर महात्माजींच्या सत्याग्रह चळवळीत त्यांनी झोकून दिले. 1930 साली दांडीयात्रेच्या वेळी त्यांना अटक झाली. 1931 साली त्यांनी दुसऱया गोलमेज परिषदेत भाग घेतला. सविनय कायदेभंग व छोडो भारत आंदोलनात भाग घेऊन त्यांनी 21 महिन्यांचा तुरुंगवास भोगला. सरोजिनी नायडू या प्रसिद्ध कवयित्री व ‘नायटिंगेल ऑफ इंडिया’ (महात्मा गांधींनी त्यांना हे अभिधान प्रदान केले होते) म्हणून प्रसिद्ध होत्या.
जगद्विख्यात तत्त्वज्ञ व आंग्ल लेखक आल्डस हक्स्ले हे मुंबईला आले असताना सरोजिनी नायडू यांना भेटले होते. त्यांची बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व यांचा हक्स्ले यांच्यावर प्रभाव पडला होता. स्वतंत्र्यलढय़ात स्त्रियांनी सहभागी व्हावे यासाठी महात्माजींची प्रेरणा कारणीभूत ठरली होती. मात्र सुरुवातीला स्वतः गांधीजी यासाठी अनुकूल नव्हते. पण महिलांचा उत्साह पाहून त्यांना त्यांचे स्वागत करावे लागले.
स्वातंत्र्य ही एक प्रेरणा आहे आणि त्यासाठी निकराने लढण्याचे काम जगभरातील स्त्रियांनी केले आहे. इतिहासकाळात व भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातही जगभरातील स्त्रियांची चिकाटी व धैर्य अतुलनीय आहे. या स्वातंत्र्यशलाकांचे स्मरण या निमित्ताने करणे समयोचित आहे.