सामाजिक कार्यकर्त्यांनी केला मिठाई, भेटवस्तू देऊन सन्मान
प्रतिनिधी / कर्मचाऱ्यांची दिवाळी
कोरोना महामारीच्या काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाजवळ जाण्याची परवानगी देखील नाकारण्यात आली होती. अशा परिस्थितीत केवळ पीपीई किट घालून शेकडो मृतदेहांवर पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱयांनी स्वतः पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या या कर्मचाऱयांच्या सेवेची जाणीव ठेवून सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर पतकी आणि किरण पडवळ यांच्या पुढाकाराने पंचगंगा स्मशानभूमीतील 24 कर्मचाऱयांना शाल, श्रीफळ आणि मिठाईचे बॉक्स देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी कोरोनाच्या संकटात अत्यंत महत्त्वाची सेवा बजावणारे आणि सामाजिक जाणीव ठेवून कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते हर्षल सुर्वे आणि कोरोना युद्धामध्ये अग्रणी असणारी तरुणी कोविड योद्धा कुमारी प्रिया पाटील यांच्या हस्ते या चोवीस कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक राजू हुंबे उपस्थित होते.
कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या मृतदेहांवर पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱयांनी अंत्यसंस्कार केले. त्या कार्याची जाणीव ही माणुसकीच्या पुस्तकातील सर्वात मोठा धडा ठरली, अशी भावना यावेळी रामेश्वर पतकी आणि किरण पडवळ यांनी बोलून दाखवली. राजू हुंबे यांनी या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून आम्ही सदैव तुमच्यासोबत राहू, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी हर्षल सुर्वे आणि प्रिया पाटील यांनी कोरोना काळात आलेले अनेक अनुभव विषद केले. याप्रसंगी स्मशानभूमीतील आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे, विलास कांबळे, राजेंद्र कांबळे, विल्सन दाभाडे, करण बनगे, रोहित ढाले यांच्यासह चोवीस कर्मचाऱ्यांना मिठाई दिवाळी अभ्यंगस्नानाचे साहित्य तसेच शाल-श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.