मगो नेते सुदीन ढवळीकर यांचा इशारा,
प्रतिनिधी /म्हापसा
राज्यात स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी गरीब मुलांना शिकविले. मात्र आज राज्य सरकारला गरीब मुलांना शिक्षणच द्यायचे नाही. ऑनलाईन शिक्षण आम्ही देत नाही असे विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, मात्र काल त्यांनी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात काही ठिकाणी अद्याप स्मार्टफोनबाबत कनेक्टिव्हीटी मिळालेली नाही. सत्तरी, धारबांदोडा व अन्य गावांचा यात समावेश आहे. त्यामुळे स्मार्टफोन नसलेल्या गोरगरीब जनतेच्या पालकांना घेऊन एक दिवस आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचा इशारा आमदार सुदीन ढवळीकर यांनी दिला.
भाऊसाहेब बांदोडकरांनी शिक्षण क्षेत्रात त्यावेळी परिवर्तन केले होते. मात्र मुख्यमंत्री आज 25 वर्ष राज्याला मागे नेण्याकडे बघत आहेत. आज विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही. ऑनलाईनसाठी स्मार्टफोन प्रत्येक घराघरात मुख्यमंत्र्यांनी द्यावे. कनेक्टिव्हीटीसाठी राज्य सरकारने किती टॉवर उभे केले. राज्यात आज एकही टॉवर नाही. सर्वत्र रिलायन्स टाटा कंपनी टॉवर उभारण्यास तयार आहे. मात्र सरकारचे राजकारण वेगळेच आहे. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना शिक्षण द्याचेच नसल्याचा आपण जाहीर आरोप करीत असल्याची माहिती आमदार ढवळीकर यांनी पत्रकारांना दिली.
भाजप, काँग्रेसने एकमेकांचे आमदार फोडले
राज्यात कोविडमुळे हाहाकार माजला असून 3 हजार लोक मुत्यूमुखी पडले. सरकार यावर काहीच उत्तर देऊ शकत नाही. ऑक्सिजन नसल्याने किती लोक मृत्यूमुखी पडले हे सरकार सांगू शकत नाही. आज कसत असलेल्या जमिनी तुम्हाला कुणी दिल्या हे कुणालाही माहीत नाही. भाऊसाहेबांनी टेन्डन्सी कायदा तयार केल्याने या जमिनी तुम्हाला मिळाल्या. स्व. शशिकला ताईंनी तुमच्या जमिनी तुमच्या नावावर केल्या. मुंडकार कायदा 1968 साली भाऊनी हातात घेतला तो पास करण्यास 1974 साल उजडावे लागले. त्यानंतर शाळा महाविद्यालये म.गो.ने दिले. काही लोक उडय़ा मारून दुसऱया पक्षात गेले. भाजप व काँग्रेसने राज्यात काहीच केले नाही. एकामेकांचे आमदार फोडले व आपले सरकार स्थापन केले. युवा पिढीने हे लक्षात ठेवायला पाहिजे. भाऊंचा मगो पक्ष सर्वसामान्य नागरिकांना योग्य दिशा देणार व मार्गदर्शन करणार, असे ढवळीकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी बोलण्यापेक्षा मटक्यावाल्यांना आतमध्ये टाकावे
राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काल दोघांची नावे घेऊन मटक्यावर बोलतात. राज्यमंत्री मंडळात एक आणि बाहेर दोन माणसे मटका व्यवसायात गुंतलेले आहेत. मुख्यमंत्री त्यांची नावे घेऊन कसे काय बोलतात. आपण गप्प बसणार नाही. एक माणूस मंत्रिमंडळात तर एक भाजपचा माजी आमदार आहे. या सर्व गोष्टी माहीत असताना मुख्यमंत्री गप्प का बसतात. पकडून आतमध्ये टाका. म.गो. ने 17 वर्षे युवा पिढीला बरोबरीने घेऊन राज्य केले होते. ते राज्य मगो पक्ष पुन्हा करून दाखविणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शेवटपर्यंत मगो पक्षातच रहाणार
मगो पक्ष देवदेवतांच्या आशीर्वादाने वर आलेला पक्ष आहे. त्यामुळे गेली 25 वर्षे मगो पक्षात आहे आणि निवडून येत आहे आणि हयातभर याच पक्षात रहाणार. येत्या विधानसभा निवडणुकीत जनजागृती करून काँग्रेस व भाजप आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन करणार असल्याचे ते पुढे म्हणाले.