एप्रिल-जून तिमाहीमध्ये 13 टक्के घट
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतामध्ये सध्या कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रवास सुरु आहे. या संकट कालावधीत विविध उद्योगधंदे प्रभावीत झाले. यामुळे काही व्यवसाय तेजीत तर काही नुकसानीत राहिल्याचे विविध अहवालांमधून सांगण्यात आले आहे. चालू वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीतील मागील तिमाहीच्या तुलनेत स्मार्टफोन शिपमेंटमध्ये( जहाजामार्फत वाहतूक) 13 टक्क्यांची घसरण होत ती 3.24 कोटीवर राहिली असल्याची माहिती संशोधन फर्म कॅनलिस यांनी दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार वर्षाअगोदर समान कालावधीच्या तुलनेत स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्ये जवळपास 87 टक्क्यांची वाढ राहिली आहे. यात एप्रिल ते जून 2020 दरम्यानच्या तिमाहीत सक्तीच्या सलग दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याचा फटका बसल्याची माहिती दिली आहे.
जून 2021 मधील तिमाहीमध्ये मात्र शाओमी 29 टक्क्यांच्या बाजार हिस्सेदारीसोबत (95 लाख युनिटची आवक) अग्रस्थानी राहिली असून यासह सॅमसंग 17 टक्क्यांच्या (55 लाख)हिस्सेदारीसोबत दुसऱया स्थानी व विवो (54लाख) तिसऱया स्थानावर राहिली आहे. रिअलमीने ओप्पेला मागे टाकत चौथे स्थान काबीज केले आहे. कोरोनाच्या लाटेमुळे अनेकांच्या उत्पन्नावर मर्यादा आल्याने दरम्यानच्या काळात स्मार्टफोन विक्रीही काहीशी प्रभावीत राहिली आहे.