बेळगाव :
स्मार्ट सिटीचे काम सुरू असतानाच कोरोनाचे संकट आले आणि या कामांचा अक्षरश: बोजवारा उडाला. रखडलेली कामे, त्यात अर्धवट सुरू आणि बंद रस्ते नागरिकांच्या डोकेदुखीचे ठरत आहेत. तिसऱया रेल्वे गेटच्या कामाच्या स्थितीने तर नागरिकांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आलाय. स्मार्ट कामांचा तिढा; अन् नागरिकांना बसतोय वेढा, असेच म्हणण्याची वेळ सध्या आली आहे.
तिसरे रेल्वेगेट जवळील ओव्हर ब्रिजचे काम सुरू होऊन आठ ते दहा महिने झाले. या महिन्यात तिसऱया रेल्वे गेटवरील वाहतूक काँग्रेस रोड मार्गे वळविण्यात आली. त्यावेळी येथील रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला होता. यादरम्यान मार्चमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे कोरोनाच्या संकटाने अनेक कामगार आपापल्या राज्यात निघून गेले. मात्र बंद रस्ते तसेच राहिले याचा व्यावसायिक, नोकरदार वर्ग व सर्वसामान्यांना फटका बसला.
तिसरे रेल्वे गेटवरील वाहतूक एकेरी
आता तिसरे रेल्वे गेटवरील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. त्यामुळे पिरनवाडी-उद्यमबाग मच्छे या भागातून येणाऱया नागरिकांना आरपीडीला जायचे असल्यास काँग्रेस रोड मार्गे जावे लागत आहे. पण काँग्रेस रोडवर एका बाजूने स्मार्ट सिटीचे काम करण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे भूमिगत विद्युत वाहिन्या रस्त्यावर तशाच टाकण्यात आलेल्या आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे एखादी रेल्वे दुसऱया रेल्वे गेट वरून गेल्यास वाहतुकीची कोंडी मोठय़ा प्रमाणात होत आहे.
तसेच पहिले रेल्वे गेट देखील बॅरिकेट्स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या रेल्वे गेटजवळील नागरिकांना किंवा व्हॅक्सिन डेपो मधील नागरिकांना आरपीडीला जायचे असल्यास काँग्रेस रोड मार्गे गोगटे सर्कल येथून जावे लागत आहे. पण हाही मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आल्यामुळे ग्लोब टॉकीजकडून वळसा घेऊन आरपीडीला जावे लागत आहे. त्यात इंधन दरवाढ वाढतच चालल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यात वळसा घेऊन जाणे म्हणजे नागरिकांसाठी डोकेदुखी बनली आहे.
सर्वच ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आल्यामुळे पर्यायही गायब झालेले आहे. सोमवार पेठ, मंगळवार पेठ येथील नागरिकांना जर मंडोळी रोडला जायचे असल्यास काँग्रेस रोड मार्गे दुसऱया रेल्वे गेटनजीक असलेल्या रस्त्यावरून वळसा घेऊन जावे लागते. पण हा धोकादायक वळसा वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे.
पहिल्या रेल्वे गेटजवळील बॅरिकेड्स हटवा
ब्रिटिशकालीन ओव्हर ब्रिज बांधताना अनेक समस्या आल्या. या समस्या पाहून तरी प्रशासन सुधारेल असे वाटले होते. मात्र प्रशासनाचा निवळ भोंगळ कारभार चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता तिसरे रेल्वे गेटचे काम जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तरी पिरनवाडीमार्गे आरपीडीला जाण्यासाठी रस्ता खुला करा व पहिले रेल्वे गेटजवळील बॅरिकेड्स हटवा, अशी मागणी वाहनधारकांमध्ये जोर धरू लागली आहे.