धर्मवीर संभाजी चौक बसथांब्यावरील प्रकार : पथदीप सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या स्मार्ट बसथांब्यावर विविध सुविधा उपलब्ध करण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. पण साध्या नागरी सुविधा उपलब्ध करण्यासदेखील प्रशासनाला अपयश आले आहे. धर्मवीर संभाजी चौकातील स्मार्ट बसथांब्यावरील दिवे बंद झाल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे लक्ष देतील का? अशी विचारणा होत आहे.
शहरात विविध ठिकाणी स्मार्ट बसथांबे उभारण्यात आले आहेत. पण बसथांब्याची देखभाल व्यवस्थित केली जात नाही. सीसीटीव्ही, स्मार्ट आसन व्यवस्था, डिजिटल फलक आणि ई-टॉयलेट आदीसह विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण नागरी सुविधा उपलब्ध करण्यासदेखील प्रशासनाला अपयश आले आहे. स्वच्छता, दिवे आणि आसन व्यवस्था उपलब्ध करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. स्मार्ट बसथांब्यावरील ई-टॉयलेट पूर्णपणे खराब झाले असून वापराविना धूळखात पडले आहेत. काही ठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. काही बसथांब्यांचा ताबा भटक्मया नागरिक आणि जनावरांनी घेतला आहे. अशातच धर्मवीर संभाजी चौकात ई-टॉयलेट शेजारी असलेल्या बसथांब्यावरील दिवे बंद झाले आहेत. त्यामुळे बसथांब्यावर अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना अंधारातच बसावे लागत आहे. अंधार असल्याने काही मद्यपी याठिकाणी रात्रीच्यावेळी मद्यपान करीत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील पथदीप दुरुस्त करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्मार्ट बसथांब्यावरील पथदीप सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.