22 गाळय़ांच्या माध्यमातून मनपाला प्रतिमाह 50 लाख भाडे मिळणार : मनपाच्या लिलाव प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात उभारण्यात आलेल्या स्मार्ट बसथांब्यांवरील गाळय़ांसाठी मनपाने ठरविलेल्या भाडय़ापेक्षा आठ पट म्हणजेच 27 हजार रुपये बोली लावण्यात आली. यावेळी 10 गाळय़ांसाठी 46 नागरिकांनी भाग घेऊन बोली लावली. तसेच शिवबसवनगरमधील केपीटीसीएल कार्यालयाशेजारी स्मार्ट रोडवरील गाळय़ांसाठी दुसऱयांदा आयोजित केलेल्या लिलावात 22 हजार 500 रुपये सर्वाधिक बोली लागली. 22 गाळय़ांच्या माध्यमातून मनपाला प्रतिमाह 50 लाख भाडे मिळणार आहे.
स्मार्ट बसथांब्यांवरील गाळे भाडेतत्त्वावर घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे गुरुवारी महापालिकेच्या लिलाव प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एका गाळय़ाला प्रतिमहिना 3 हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले होते. मात्र बोलीधारकांची गर्दी वाढल्याने राणी चन्नम्मा चौकातील गाळय़ाची बोली चक्क 27 हजार रुपयांपर्यंत पोहोचली.
महापालिकेच्या विविध गाळय़ांच्या कराराची मुदत संपुष्टात आली आहे. तसेच काही गाळे नव्याने भाडेतत्त्वावर देण्यात येत आहेत. गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पण अनामत रक्कम वाढविण्यात आल्याने शिवबसवनगरमधील गाळे भाडेतत्त्वावर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी कमी होती. या परिसरात शाळा, महाविद्यालय, तांत्रिक महाविद्यालय आणि वैद्यकीय महाविद्यालये असल्याने या परिसरातील गाळय़ांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे मागील लिलावावेळी 33 हजार बोली लावण्यात आली होती. पण गाळेधारकांनी अनामत रक्कम भरणा केली नसल्याने दुसऱयांदा
लिलाव आयोजित करण्यात आला
होता.
स्मार्ट रस्त्यावर असलेल्या 14 पैकी 13 गाळय़ांकरिता लिलाव प्रक्रिया आयोजित केली होती. लिलाव प्रक्रियेत 18 नागरिकांनी सहभाग घेतला. पण 14 पैकी 3 गाळे मागासवर्गियांसाठी व अपंगांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. उर्वरित 10 गाळे खुल्या वर्गासाठी होते. मात्र यावेळी मागासवर्गियांसाठी राखीव असलेल्या गाळय़ांना 22 हजार 500 रुपयांपर्यंत बोली लागली. तर सामान्यासाठी असलेल्या गाळय़ासाठी 13,500 रुपयापर्यंत बोली लावण्यात आली. यावेळी 13 पैकी 12 गाळय़ांना बोली लावण्यात आली तर एक गाळा शिल्लक राहिला आहे.
आठ पट अधिक भाडे
स्मार्ट बसथांब्यांवर दहा ठिकाणी किओस्क गाळे उभारले आहेत. सदर गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी आयोजित केलेल्या लिलाव प्रकियेवेळी 10 गाळय़ांकरिता 46 नागरिकांनी सहभाग घेऊन बोली लावली होती. तीस हजार रुपये अनामत रक्कम भरून लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला होता. एका गाळय़ासाठी तीस हजार रुपये अनामत रक्कम आणि 3 हजार रुपये भाडे निश्चित केले होते. बोलीवेळी चढाओढ वाढल्याने स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे राणी चन्नम्मा चौकातील गाळय़ाकरिता 27 हजार रुपयांपर्यंत बोली लागली. त्यामुळे महापालिकेने निश्चित केलेल्या भाडय़ाच्या रकमेपेक्षा आठ पट जास्त भाडे मिळाले आहे. बोलीवेळी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती.
महापालिकेला 22 गाळय़ांच्या माध्यमातून वर्षाला 50 लाखापर्यंत महसूल मिळणार आहे. लिलाव प्रक्रियेवेळी महापालिकेचे महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर, महसूल अधिकारी सतीश अनिशेट्टर, कायदा अधिकारी यु. डी. महांतशेट्टी, बाबू माळण्णावर, सुशांत कांबळे, व्यवस्थापक फारूक यड्रावी, महसूल निरीक्षक नंदू बांदिवडेकर, शिवा जाधव आदींसह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.