प्रतिनिधी/ बेळगाव
सुस्थितीतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि खड्डेमय रस्त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष अशी स्थिती सध्या शहरात निर्माण झाली आहे. परिणामी शहरातील एकही रस्ता व्यवस्थित नसल्याने शहरात रस्ते शोधत प्रवास करण्याची वेळ निर्माण झाली आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरवासियांचे अक्षरश: हाल होत आहेत. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत असून वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख मार्गांसह उपनगरांतील रस्त्यांचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. प्रमुख मार्गांचे काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याने जिकडे तिकडे खोदाई करण्यात आली आहे. रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून वाहतूक वळविण्यात आल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी काँक्रिटीकरणासाठी रस्ते बंद ठेवण्यात आले असून पर्यायी नियोजन नसल्याने वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहने अडकून पडण्याचा प्रकार सुरू आहेत. शहापूरसह शहरातील विविध रस्त्यांचे काम करण्यात येत आहे. बहुतांश रस्त्यांचा विकास एकाच वेळी करण्यात येत असल्याने वाहनधारकांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे. राणी चन्नम्मा चौक ते संगोळ्ळी रायण्णा चौक आणि सम्राट अशोक चौक ते गांधीनगरपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. सीबीटीसमोर भुयारी मार्गाचे काम सुरू असून सीबीटी ते संगोळ्ळी रायण्णा चौकपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे सम्राट अशोक चौक, सीबीटी, हॉटेल त्रिवेणीसमोरील चौकात वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. क्वब रोडचे काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याने येथील रस्ता एका बाजूने वाहतुकीस खुला आहे.
बसवेश्वर चौक ते बॅ. नाथ पै चौक, हिंदवाडी, गोवावेस ते येळ्ळूर रोड कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावर खोदाई करून काँक्रीट घालण्यात आले असल्याने रस्ते बंद आहेत. बॅ. नाथ पै चौक ते छत्रपती शिवाजी उद्यानापर्यंतच्या रस्त्याचा विकास करण्यासाठी विविध कामे करण्यात येत असल्याने संपूर्ण रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जिल्हा रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, सदाशिवनगर क्रॉस ते बॉक्साईट रोडपर्यंतच्या एपीएमसी रोड अशा विविध रस्त्यांचा विकास करण्यात येत असल्याने खोदाईसत्र सुरू असल्याने वाहनधारकांना वाहने चालविणे अशक्मय झाले आहे.
शहरातील उर्वरित रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनधारकांना वाहने हाकणे कठीण बनले आहे. काही रस्त्यांवर माती घालून खड्डे बुजविण्यात आले आहेत. भरलेले खड्डे पावसामुळे पुन्हा वाहून गेले आहेत. त्यामुळे खड्डेमय रस्त्यांवरून वाहने चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.