प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध ठिकाणी विकासकामे राबविण्यात येत आहेत. काही उपनगरांतील रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. मात्र, राणी चन्नम्मानगर येथील खासगी जागेत रस्ता करण्याचा आटापिटा स्मार्ट सिटी कंपनीने चालविला आहे. त्यामुळे सदर जागामालकांनी याबाबत स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यकारी व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार केली आहे.
स्मार्ट सिटी कंपनीच्या कामकाजाला शहरवासीय कंटाळले आहेत. शहरातील विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. उपनगरांतील रस्त्यांवर पेव्हर्स घालून विकास करण्यात येत आहे. मात्र, राणी चन्नम्मानगर येथील खासगी जागेत रस्ता घालून विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वडगाव पोलीस स्थानकात साहाय्यक उपनिरीक्षकपदी कार्यरत असलेल्या शिवाजी जाधव यांच्या मालकीच्या जागेत अतिक्रमण करून रस्ता करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत. वास्तविक पाहता परिसरात बुडाने निर्माण केलेल्या वसाहतीमधील भूखंड आहेत. त्या भूखंडधारकांना बुडाने रस्त्याची सुविधा उपलब्ध करून दिली नाही. मात्र, बुडाच्या मालकीची जागा नसताना रस्ता करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे जागामालक शिवाजी जाधव यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यकारी संचालक, बुडा आणि महापालिकेकडे तक्रार करून सदर रस्त्याची जागा स्व-मालकीची असल्याचे सांगितले आहे. सदर जागा स्व-मालकीची असल्याने रस्ता करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे हे काम थांबविण्याची मागणी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
रस्ता करण्यात येत असलेली जागा बुडाच्या मालकीची असणे आवश्यक आहे. पण खासगी जागेत रस्ता करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सदर जागेवर रस्ता करण्याची तरतूद बुडाच्या शहर विकास आराखडय़ात (सीडीपी) नाही. तरीदेखील जबरदस्तीने रस्ता करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. रस्ता करण्याकरिता बुडाने किंवा जिल्हा प्रशासनाने भू-संपादन प्रक्रिया राबविली नाही. रस्ता करण्यात येत असल्याने जागामालक शिवाजी जाधव यांनी बुडाला पत्र पाठवून रस्त्याबाबत विचारणा केली असता रस्ता असल्याची कोणतीच नेंद बुडाकडे नसल्याचे पत्र दिले आहे. रस्ता करण्यासाठी भू-संपादन प्रक्रियाही राबविण्यात आली नसल्याचे पत्र बुडाने दिले आहे. रस्ता निर्माण करण्यासाठी बुडाच्या आराखडय़ात नाही. पण रस्ता करण्याची गरज निर्माण झाल्यास जमीन मालकाकडून ना हरकत दाखला घेणे आवश्यक असल्याची टिप्पणी बुडाच्या कायदा सल्लागारांनी दिली आहे. त्यामुळे सदर रस्ता बनविण्याचे काम बेकायदेशीर असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
महापालिकेकडे अर्ज करून रस्त्याबाबत विचारणा केली असता राणी चन्नम्मानगर येथील सर्व्हे क्रमांक 699 अ/3 या जागेत रस्ता असल्याची कोणतीच नोंद महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचे पत्र देण्यात आले आहे. अशी स्थिती असताना स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी सदर रस्ता बनविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने रस्त्याचा विकास करण्याचे काम थांबवावे, अशी मागणी केली आहे.