चक्क जुन्याच गटारीवर केले बांधकाम
बेळगाव/ प्रतिनिधी
स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील विकासकामे राबविण्यात येत आहेत. मात्र, विकासकामे राबविताना स्मार्ट सिटीचे अधिकारी झोपी गेल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील दक्षिण विभागात गटारीवर बांधकाम करून गटारीची उंची वाढविण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार सामोरा आला आहे.
वास्तविक पाहता गटारीची उंची वाढविणे अपेक्षित आहे. मात्र, तसे न होता चक्क जुन्या गटारीचीच उंची वाढवून नवीन बांधकाम करत असल्याचे भासविण्यात येत आहे.
शहरातील गटारींची उंची कमी असल्यामुळे जोराचा पाऊस आला तर गटारीतील सर्व सांडपाणी रस्त्यावर येते. ते व्यवस्थित गटारीतून नाल्यात वाहून जावे याकरिता गटारींची उंची तसेच रुंदी वाढविण्याची गरज आहे. मात्र, स्मार्ट सिटीचा हा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे.
या कामामुळे नागरिक वैतागले आहेत. शहरात अशा प्रकारचे काम होत असल्याने स्मार्ट सिटीचे अधिकारी झोपी गेले आहेत का? असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. हे बांधकाम केलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.