टिळकवाडी देशमुख रोड विकासाचे काम संथगतीने : मातीचे ढिगारे-चरी बनल्या धोकादायक
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत टिळकवाडी देशमुख रोडचा विकास करण्यात येणार आहे. याकरिता गटारीच्या दोन्ही बाजूने सांडपाणी वाहण्यासाठी पाईप घालण्याचे काम सुरू आहे. पण सदर काम संथगतीने करण्यात येत असल्याने परिसरातील रहिवासी आणि व्यावसायिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे परिसरातील कामे तातडीने पूर्ण करून रस्ता वाहतुकीस खुला करावा, अशी मागणी होत आहे.
आरपीडी कॉर्नर ते पहिले रेल्वेगेटपर्यंत देशमुख रस्त्याचे काँक्रिटीकरण स्मार्ट सिटी योजनेमधून करण्यात येणार आहे. सांडपाणी वाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गटारीच्या ठिकाणी पाईप घालण्याचे काम करण्यात येत आहे. पण हे काम करण्यासाठी रस्ता वाहतुकीस काही दिवस बंद ठेवण्यात आला होता. रस्त्यावर मागीचे ढिगारे असल्याने वाहनधारकांना ये-जा करण्यास अडचण होत आहे. व्यावसायिकांनाही व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी रस्त्याचे काम करण्यासाठी व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याने व्यावसायिक अडचणीत आले होते. पण आता पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढल्याने व्यवसाय बंद करावे लागत आहेत. परिसरातील रहिवाशांना घरी ये-जा करण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पहिले रेल्वेगेट ते आरपीडी कॉर्नरला जाण्यासाठी देशमुख रोड सोयीचा आहे. त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांची ये-जा असते. परिसरात विविध शाळा-महाविद्यालये असल्याने देशमुख रोडवर नेहमी वर्दळ असते. पण सदर रस्त्याचे काम सध्या रखडले आहे.
रस्त्याच्या दुतर्फा पाईप घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. पण पाईप घालण्याचे काम अर्धवट आहे. काही ठिकाणी मातीचे ढिगारे आणि खोदण्यात आलेल्या चरी वाहनधारकांना धोकादायक बनल्या आहेत. वास्तविक पाहता वर्दळीचा रस्ता असल्याने प्राधान्यक्रमाने रस्त्याचे काम पूर्ण करण्याची गरज आहे. पण याकडे स्मार्ट सिटी कपंनीच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वाहनधारकांना अडचण बनली असून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.