बेळगाव : स्मार्ट सिटीअंतर्गत शहराचा कायापालट करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातच्या विविध भागात विकासकामे राबविण्यात आली आहेत. यात डेनेज, गटारी, भूमिगत विद्युत वाहिन्या, रस्ते करण्याचे काम सुरू आहे. मात्र, एकदा केलेले काम व्यवस्थित झाले नसल्याने पुन्हा ते बांधकाम फोडण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. येथील रामदेव हॉटेलनजीक असलेल्या पै हॉटेलच्या विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर हा प्रकार पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकदा झालेली विकासकामे पुन्हा करण्यात येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील बहुतांश भागातील कामे अर्धवट स्थितीत आहेत. काही ठिकाणचे कंत्राटदार बदलले गेल्याने विकासकामे अर्धवट स्थितीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
या अर्धवट विकासकामांचा फटका व्यावसायिकांना बसत असल्याने व्यावसायिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबरोबरच दुकानांच्या समोर खोदाई यासह अन्य कामे करण्यात दिरंगाई होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे एकदाच विकास कामे करा. मात्र ती चोख करा, अशी मागणी होत आहे.