बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची गती पुन्हा मंदावली असून, याचा फटका नागरिकांना बसत आहे. महावीर भवन ते हिंदवाडी परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. पण सदर काम अर्धवट असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी धोकादायक वळणे असल्याने अपघात घडत आहेत.
शहरातील विविध भागातील रस्त्याचे काँक्रिटीकरण युद्धपातळीवर करण्यात येत आहे. पण उर्वरित कामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर साईडपट्टय़ांचे काम करणे गरजेचे आहे. पण काँक्रिट झाल्यानंतर 15 दिवसानंतरही साईडपट्टय़ांचे काम पूर्ण करण्यात येत नाही. सदर कामाची गती मंदावली असल्याने शहर उपनगरात अनेक कामे रखडलेल्या अवस्थेत आहेत. डाकबंगला ते बॅ. नाथ पै सर्कल पर्यंतच्या रस्त्यावरील काँक्रिट घालण्यात आले पण साईड पट्टय़ांचे काम 15 दिवसांपासून रखडले आहे. तसेच महावीर भवन ते हिंदवाडी पर्यंत रस्त्याच्या एका बाजुचे काँक्रिटीकरण करण्यात आले. पण दुसऱया बाजुचे काँक्रिटीकरण 3 महिन्यापासून रखडले आहे. सदर रस्त्यावर वळणे असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. काँक्रिटीकरण करण्यात आलेला रस्ता अरूंद असल्याने दोन्ही बाजुने वाहने आल्यास अडथळा निर्माण होत आहे. जुन्या रस्त्यापासून काँक्रिट करण्यात आलेला रस्ता एक फूट उंच असल्याने वाहने बाजुला घेणे अशक्मय आहे. परिणामी या ठिकाणी वाहतुक कोंडी होत आहे. यापूर्वी डेनेज वाहिन्या घालण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला होता. त्यामुळे वाहतुकीस अडचणीचे बनले होते. पावसाळय़ात या रस्त्यावरून ये-जा करणे मुश्किल बनले होते. सध्या देखील हे काम अपूर्ण असल्याने परिसरातील रहिवाशांना हा रस्ता धोकादायक बनला आहे. रखडलेले काम तातडीने पूर्ण करून वाहतुकीस खुला करावा अशी मागणी होत आहे.