कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी : बेळगाववासियांना खड्डेमुक्त रस्ते कधी मिळणार हा प्रश्नच
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटीची कामे कासवाच्या गतीने सुरू आहेत. बेळगाव शहराचे विस्तारीकरण वाढत आहे, तसतशा समस्या भेडसावत आहेत. बारा महिने न संपणारी समस्या म्हणजे रस्ता आहे. रस्त्यासाठी वारंवार निवेदने, रास्ता रोको करण्यात येतो. मात्र, कालांतराने याकडे दुर्लक्ष होऊन पुन्हा येरे माझ्या मागल्या, हीच परिस्थिती निर्माण होते. वारंवार सूचना करूनही स्मार्ट सिटीचे अधिकारी या कामांकडे दुर्लक्ष करण्यात आपली धन्यता मानतात. संथगतीची कामे आणि धुळीचा लोळ उठत आहे. धूळ डोळय़ात जाऊन अपघात होण्याची शक्मयता वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांतील खड्डे व डांबरीकरण करण्याची गरज निर्माण होऊ लागली आहे.
शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यांवरून जाताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. वारंवार तक्रारी व आंदोलने तसेच निवेदनेही देण्यात आली, मात्र या निवेदनांना केराची टोपली दाखविण्यात आली. यामुळे स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खाते तसेच संबंधित अधिकाऱयांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत असला तरी यावर उपाय मात्र काहीही नसल्याचेच प्रकर्षाने जाणवू लागले आहे. रस्त्यांच्या कामासाठी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात येत आहेत. त्या बॅरिकेड्समुळे वाहनचालकांना वळसा घालून जावे लागत आहे. याचबरोबर वादाचे प्रसंगही घडत आहेत.
बेळगाव शहराचा आता स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला असून त्या अनुषंगाने येथे सोयी-सुविधाही उपलब्ध होणे गरजेचे आहे. फक्त नावापुरती स्मार्ट राहून विकासाकडे दुर्लक्ष केल्याने शहर स्मार्ट होणार नाही. तेव्हा तातडीने ही कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. स्मार्ट शहरासाठी स्मार्ट रस्त्यांची गरजही निर्माण झाली आहे. मात्र, सध्याचे रस्ते स्मार्ट तर नाहीतच उलट धुळीचे लोळ उठणारे झाले आहेत. ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे बेळगाववासियांना खड्डेमुक्त रस्ते कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाला सुरुवात होताच रस्त्यांवर दरवर्षीच खड्डे निर्माण होतात. पावसाळय़ापूर्वी हे रस्ते पूर्ण व्हावेत, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत काही रस्त्यांचे काम अलीकडेच झाले आहे. या रस्त्यांवरदेखील खड्डे पडल्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट होत आहे. खड्डय़ांमुळे वाहनधारकांना आणि नागरिकांनाही समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा खड्डय़ांचा अंदाज न आल्यामुळे वाहनांचे लहानसहान अपघात होतात. तसेच खड्डय़ांमुळे वाहन नादुरुस्त होण्याच्या प्रकारांमध्येही वाढ झाली आहे.
माती टाकून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येते. यामुळे रस्त्यावर धुरळा पसरत आहे. उन्हामध्ये धुळीचा त्रास सहन करावा लागतो. धुळीमुळे अनेकांच्या डोळय़ांचा प्रश्नही उभा राहिला आहे. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाळय़ापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.