कामे संथगतीने होत असल्याचा आरोप : अनेक कामे रेंगाळल्याने स्मार्ट सिटीचा प्रकल्प यशस्वी होण्याबाबत प्रश्न उपस्थित
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारने राज्यातील अनेक शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश केला आहे. बेळगावचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र सध्या कामे अत्यंत संथगतीने होत आहेत. याचबरोबर स्मार्ट सिटीचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते, गटारी, पाणीपुरवठा यासंदर्भात पुढील दुरुस्ती तसेच त्याचे नियोजन कोण करणार? याबाबत काहीच ठरविण्यात आले नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीचा प्रकल्प यशस्वी होणार काय? असा प्रश्न विधानपरिषद सदस्य तिप्पेस्वामी यांनी केला.
यावर नगरविकास मंत्र्यांनी याबाबत अजून निर्णय झाला नाही, अशी माहिती विधानपरिषद सभागृहात दिली. बेळगावसाठी 580 कोटी रुपये आतापर्यंत खर्च केले गेले आहेत. सध्या 73 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अजूनही बरीच कामे प्रलंबित आहेत. स्मार्ट सिटी करा, मात्र कामांचा दर्जा राखा, तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱया निधीतून सिटीचा कायापालट करा, असे विधानपरिषद सदस्य तिप्पेस्वामी यांनी सांगितले.
स्मार्ट सिटीअंतर्गत सध्या तरी शहरांचा विकास होताना दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. एका विभागाचा दुसऱया विभागाशी समन्वय नाही. अनेक ठिकाणी गटारी, रस्ते अर्धवट स्थितीत आहेत. बऱयाच ठिकाणी वनविभागाने तक्रारी दिल्या आहेत. बेळगाव शहरामध्ये कॅन्टोन्मेंटने अजूनही अनेक ठिकाणी एनओसी दिली नाही. त्यामुळे कामे रेंगाळली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या योजना अपयशी ठरणार काय? असा प्रश्न तिप्पेस्वामी यांनी केला आहे.
कामे पूर्ण झाली तरी त्याची दुरुस्ती आणि देखभाल करण्याबाबत सरकारकडे अजून कोणताच आराखडा नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. वास्तविक या सर्व रस्ते, गटारी तसेच प्रकल्पांच्या देखभालीचा भार कोण घेणार? याचे संपूर्ण नियोजन सरकारने करणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी तिप्पेस्वामी यांनी केला आहे.
देखभालीबाबतही निर्णय घेतला जाईल नगरविकास मंत्री भैरती बसवराज यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. अंतिम टप्प्यात स्मार्ट सिटींची कामे असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे मध्यंतरी कामे बंद होती. मात्र आता पुन्हा कामे सुरू झाली असून लवकरच कामे पूर्ण होतील आणि देखभालीबाबतही निर्णय घेतला जाईल, असे सभागृहात सांगितले.