रस्ते, गटार खोदकामामुळे वाहतुकीवर परिणाम : रात्रीच्यावेळी कर्णकर्कश आवाजामुळे अभ्यास, झोपणे झाले मुश्किल
प्रतिनिधी /पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्मार्ट सिटी’ संकल्पनेनुसार पणजी सिटीचे ‘स्मार्ट सिटी’ करण्यासाठीचे प्रयत्न गेल्या चार-पाच वर्षांपासून सुरु आहेत. त्यानुसार रस्ते, गटारे खोदली जात आहेत मात्र या कामात होणाऱया दिरंगाईचा मनस्ताप पणजीवासियांना सोसावे लागत असून अपघातांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली पणजी शहरातील रस्ते, गटारे ठिकठिकाणी खोदून पाईपलाईन, केबल लाईन टाकण्याचे काम सुरु आहेत. याबाबतची कसलीच सूचना कुठल्याच वार्डातील रहिवाशांना देण्यात येत नाही. सकाळी उठल्यानंतर अचानक सुरु असलेल्या खोदकामावरुन लोकांना समजते. त्यातच बॅरिकेटस लावून तेथील रस्ता पूर्णतः अडविला जातो. त्यामुळे गाडी काढायची तरी कोठून? असा प्रश्न रहिवाशांना पडतो. संपूर्ण पणजी शहरात एकाचवेळी सुरु असलेल्या कामामुळे ठिकठिकाणचे रस्ते अडविले आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.
रस्ता खोदल्यानंतर तो वेळेत बुजवून पूर्वी सारखा हॉटमिक्स रस्ता करणे सर्वांसाठी सोयीचे असते मात्र तसे होताना दिसत नाही. खोदलेले चर, खड्डे केवळ माती टाकून बुजविले जातात. महिनोमहिने त्यावर डांबर किंवा सिमेंट टाकले जात नाही. त्याचबरोबर खोदलेली मातीही रस्त्याच्या बाजूला तशीच पडून राहाते. त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन सतत वाहतूक कोंडीच्या समस्येचा पणजीवासियांना सामना करावा लागत आहे. सध्या मळा, भाटले, सांतोमे, 31 जानेवारी रस्ता, कोर्तिन, महालक्ष्मी मंदिर, साईबाबा मंदिर, सांतईनेज, सांतईनेज – टोंक आल्तीनो, चर्च परिसर, पणजी – पाटो परिसर, पोस्ट ऑफिस, सचिवालय, कांपाल, तांबडी माती, भाटले, 18 जून रस्ता अशा या महत्त्वाच्या रस्त्यांवर खोदकामे सुरु असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहे.
रस्ता खोदण्यासाठी आणलेल्या मशिनांचा कर्णकर्कश आवाजामुळे रात्रीच्यावेळी आजूबाजूच्या रहिवाशांची झोपमोड होते आहे तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षाही चालू असून या आवाजामुळे अभ्यास करणे देखील तापदायक ठरत आहे. या खोदकामामुळे वाहतूक कोंडी होऊन किंवा वाहतूक अन्यत्र वळविल्यामुळे लांबच्या रस्त्याने कामावर जावे लागत असल्याने अनेकांना वेळेत निश्चित ठिकाणी पोहोचताच येत नाही आहे. त्यामुळे संबंधित विभागाने नियोजनबद्धरित्या ‘स्मार्ट सिटी’चे काम करुन या त्रासापासून सुटका करावी, अशी मागणी पणजीवासियांनी केली आहे.