शहरातील अनेक कामे अर्धवट असल्याने समस्येत भर : जिजामाता चौकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, विकासकामे लवकर पूर्ण करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
सध्या बेळगाव शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू आहे. यामुळे शहराच्या विविध भागात स्मार्ट सिटीअंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. परंतु अर्धवट असलेली हीच विकासकामे आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहेत. फोर्ट रोडवरील जिजामाता चौक येथे तर ही समस्या प्रकर्षाने जाणवत आहे.
सध्या बेळगावची परिस्थिती पाहता खरंच बेळगाव स्मार्ट सिटी झाली आहे का, असा प्रश्न पडतो. कारण जिथे तिथे पहावे तिकडे अर्धवट विकासकामे झालेली पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आपले पूर्वीचेच बेळगाव बरे होते, असे म्हणायची वेळ आली आहे.
जिजामाता चौक येथे उड्डाणपुलाच्या शेजारी गेल्या वर्षभरापासून गटारीचे बांधकाम सुरू आहे. मात्र, सहा महिन्यांपासून येथील विकासकामे बंद असल्यामुळे या चौकात दोन्ही बाजूंनी धोका निर्माण झालेला पाहायला मिळत आहे.
येथील गटारीचे बांधकाम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. अर्धवट बांधकामामुळे एखादी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी बॅरिकेड्स लावून संरक्षण देण्यात आले असले तरी नजरचुकीने अपघात होऊन निरपराध्याचा जीव जाण्याची शक्मयता वाढली आहे.
जिजामाता चौकाला समस्येचे ग्रहण
येथील गटारींची स्वच्छता न केल्यामुळे गटारीत कचरा साचून राहिला आहे. हा गटारीतील कचरा काढण्याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे गटारीतील सांडपाणी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. एकंदरीत येथील परिस्थिती पाहता जिजामाता चौकाला समस्येचे ग्रहण लागलेले दिसत आहे.
येथे जवळच भरतेश शाळा व महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांची आणि पालकवर्गाची मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. तसेच फोर्ट रोडवर कामानिमित्त बेळगावचे नागरिक ये-जा करीत असतात. त्यामुळे या भागात नित्याचीच गर्दी पाहायला मिळते. यामुळे दुर्घटना होण्याची शक्मयता मोठय़ा प्रमाणात वाढली असून या अर्धवट स्मार्ट सिटीच्या कामाचा फटका नागरिकांना बसत आहे.
अर्धवट कामे तातडीने पूर्ण करा
स्मार्ट सिटीची कामे करण्यास दिलेला निधी अपुरा पडत आहे का? किंवा या निधीचा वापर दुसऱया ठिकाणी करण्यात आल्यामुळे येथील कामांना ब्रेक लागला आहे का, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. त्यामुळे शहरातील अर्धवट ठेवलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.