प्रतिनिधी / कोल्हापूर
केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत 2019-20 मध्ये हागणदारीमुक्त अभियान अंतर्गत येणाऱया मुद्यांच्या अनुषंगाने ‘स्वच्छता दर्पण 2019’ या ऑनलाईन गुणांकन स्पर्धेमध्ये अव्वल आलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचा दिल्ली येथे सन्मान करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यावतीने प्रतिनिधी म्हणून पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी सिने अभिनेते अमीरखान यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. कोल्हापूर जिल्हा परिषद देशातील अव्वल 10 जिल्हा परिषदांपैकी एक ठरली असून देशाच्या पश्चिम भागातील आणि महाराष्ट्र राज्यातील एकमेव ठरली आहे.
या कार्यक्रमास परमेश्वरन अय्यर, सचिव पेयजल व स्वच्छता विभाग केंद्रशासन, अरूण बरोका , अतिरिक्त सचिव, पेयजल व स्वच्छता विभाग केंद्रशासन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. स्वच्छता दर्पण गुणांकन पध्दतीमध्ये हागणदारीमुक्त गाव, शौचालय बांधकाम आणि वापर, गावांची पडताळणी, शौचालय बांधकाम जिओ टॅगिंग, आर्थिक प्रगती नोंद करणे तसेच गावस्तरावरील जनजागृती उपक्रम, श्रमदान, लोकसहभाग आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या घटकांवर आधारित कामगिरीचे ऑनलाईन नोंदीनुसार मूल्यमापन करून गुणांकन करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, सर्व खातेमप्रमुखांच्या मार्गदर्शनामुळे तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सी.एम. फेलो, सर्व गट विकास अधिकारी आणि त्यांचे अधिनस्त सर्व अधिकारी आणि कर्मचारी, तसेच गावस्तरावरील सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छाग्रही व इतर सर्व कर्मचारी यांनी घेतलेले कष्ट आणि केलेले नियोजनबध्द काम यामुळे हे यश मिळाले असून देशाच्या राजधानीत कोल्हापूरचा गौरव झाला आहे.