प्रतिनिधी / कोल्हापूर
केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्वच्छता दर्पण या ऑनलाईन गुणांकन प्रक्रियेत कोल्हापूर जिल्हय़ाने देशातील पहिल्या दहा राज्याच्या यादीत स्थान पटकावले आहे. गुणांकणामध्ये देश स्तरावर अव्वल जिल्हय़ांमध्ये स्थान मिळवणारा कोल्हापूर जिल्हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. ओडीएफ एस (हागणदारीमुक्त ) आणि ओडीएफ प्लस अंतर्गत येणाऱया मुद्यांच्या आधारे ही ऑनलाईन गुणांक प्रक्रिया राबविण्यात आली होती. 12 जानेवारीला पेयजल व स्वच्छता मंत्रालय नवी दिल्लीच्या वतीने जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी दिली.
पेयजल व स्वच्छता मंत्रालय यांनी हागणदारीमुक्त झालेल्या आणि हागणदारीमुक्त न झालेल्या राज्यांसाठी स्वतंत्र गुणांकण पद्धती तयार केली होती. यामध्ये गाव पातळीवरील अभियान अंतर्गत झालेले काम, जिल्हय़ांची विविध कामातील प्रगतीचे मुद्दे विचारात घेवून ऑनलाईन प्रणालीवर नोंद करण्यात आलेल्या अहवालाच्या अनुषंगाने गुणांकण करण्यात आले. 1 जून, 2019 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन गुणांकन प्रक्रियेची नोंद घेण्यात आली. यानुसार कोल्हापूर जिल्हा हा राज्यात प्रथम गुणांकणावर राहिला.
स्वच्छता दर्पण गुणांकण पद्धतीमध्ये हागणदारीमुक्त गाव, शौचालय बांधकाम आणि वापर, गावांची पडताळणी, शौचालय बांधकाम जिओ टॅगिंग, आर्थिक प्रगती नोंद करणे तसेच गावस्तरावरील जनजागृती उपक्रम, श्रमदान, लोकसहभाग आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या घटकांवर आधारित ऑनलाईन
प्रणालीवर माहिती देण्यात आली होती. या प्रणालीनुसार देशातील 10 अव्वल ठरलेल्या जिल्हय़ांचा गौरव 12 जानेवारीस पेयजल व स्वच्छता मंत्रालय यांच्या मार्फत नवी दिल्ली येथे करण्यात येणार असून या जिल्हय़ांची कार्यशाळाही होणार आहे.
सामूहिक प्रयत्नांचे यश
अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, सर्व खातेमप्रमुख यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व अधिकारी, कर्मचारी, गावस्तरावरील सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छाग्रही यांनी घेतलेले कष्ट आणि केलेले नियोजनबद्ध काम यामुळे हे यश मिळविता आले. सामूहिक प्रयत्नांचे यश आहे.
प्रियदर्शनी मोरे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद