प्रतिनिधी/ चिपळूण
महापुराच्या विळख्यात अडकलेल्या चिपळूण शहरात कचरा व चिखल उपसण्यासाठी आणि शहर दुर्गंधीमुक्त करण्यासाठी स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर राबवण्यात येत असली तरी शहरातील कचरा काही संपता संपेनासा झाला आहे. त्यामुळे कचऱयाचे साम्राज्य कायम आहे. यामुळे शहरात कमालीची दुर्गंधी पसरली असून हा कचरा वेळीच न उचलल्यास रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहरातील संपूर्ण बाजारपेठ महापुरात बुडाल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुकानांतील खराब साहित्य व चिखल बाहेर काढताना व्यापारी हैराण झाले आहेत. पूर येऊन 10 दिवस झाले तरी चिखल संपता संपत नसल्याचे दिसत आहे. दररोज प्रशासनासह अनेक सामाजिक संस्था, मंडळे, अनेक व्यक्ती यांच्या माध्यमातून शेकडो हात स्वच्छतेत गुंतले आहेत. मात्र जेवढा कचरा काढला जात आहे, त्यापेक्षा अधिक ढिगारे पुन्हा बाजारपेठेतील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी निर्माण होत आहेत.
सर्व दुकाने साफ झाल्याशिवाय कचरा हटणार नाही
आतापर्यंत शहरातील काही मोजकीच छोटी दुकाने स्वच्छ झाली आहेत. बहुतांश दुकानांमध्ये अद्याप खराब साहित्य अन् कपडे तसेच पडून आहेत. व्यापारी आपल्यापरिने दुकाने साफ करण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण दुकाने साफ होण्यास आणखी आठवडा तरी लागेल, असे अनेक व्यापाऱयांनी सांगितले. त्यामुळे सर्व दुकाने साफ झाल्याशिवाय शहरातील कचरा हटणार नाही, असे दिसून येते.
शहरातील परिस्थिती गंभीर
बाजारपेठेतील कचरा साफ करण्यात अनेक हात गुंतले असले तरी शहर परिसरातील कचरा मात्र साफ होत नाही. शहरातील अनेक प्रभागात कचऱयाचे ढीग आहेत. साचलेल्या कचऱयाच्या ढिगाऱयावरच नागरिक पुन्हा रोजचा कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे हा कचरा कुजून परिसरात कमालीची दुर्गंधी पसरली आहे. त्याच्यातच गाढवे, कुत्री, गुरे हा कचरा सर्वत्र पसरत आहेत. यामुळे घाणीत भर पडत आहे. यामुळे नगर परिषद हा सर्व कचरा केव्हा उचलणार आणि शहर केव्हा कचरामुक्त होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
रोगराईची शक्यता
शहरात सर्वत्र कचऱयाचे साम्राज्य व कमालीची दुर्गंधी पसरली आहे. बाजारपेठेतील अनेक दुकानांतील कुजलेला माल उपसायचे काम सुरूच आहे. कापड व्यापारी पाण्यात भिजलेले व चिखलाने माखलेले कपडे कवडीमोलाने विकून थोडी का होईना पुंजी हाती लागण्याची धडपड करत आहेत. त्यातच खरेदीसाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दी होत आहे. अनेकदा व्यापाऱयांसह ग्राहकांच्या तोंडावर मास्क नसल्याचे दिसत आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने रोगराई पसरणार नाही, या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे बनले आहे.