चौथ्यांदा देशात अग्रस्थानी : केंद्र सरकारचे स्वच्छता सर्वेक्षण
वृत्तसंस्था/ इंदोर
केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात सलग चौथ्यांदा इंदोरची देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवड झाली आहे. स्वच्छता सर्वेक्षणाच्या एप्रिल ते जूनच्या पहिल्या तिमाहीत भोपाळला देशभरात दुसरे स्थान प्राप्त झाले आहे. जुलै-सप्टेंबरच्या दुसऱया तिमाहीत राजकोट शहराला दुसरे स्थान प्राप्त झाले आहे.
याचबरोबर 10 लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या शेणीत जमशेदपूरला पहिले स्थान मिळाले आहे. तर सर्वेक्षणामध्ये पहिल्या तिमाहीत सूरतला तर दुसऱया तिमाहीत नवी मुंबईला तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष मंगळवारी जाहीर करण्यात आले आहेत.
भारत सरकारने स्वच्छ भारत मोहिमेस 2 ऑक्टोबर 2014 रोजी प्रारंभ केला होता या मोहिमेस आता 5 वर्षे पूर्ण झाली असून या कालावधीत देशभरात स्वच्छतेला आंदोलनाचे स्वरुप देण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांचा प्रभाव अनेक भागांमध्ये दिसून आला आहे.
महापौरांकडून अभिनंदन
इंदोर शहराच्या महापौर मालिनी गौड यांनी शहरवासीयांचे अभिनंदन केले आहे. स्वच्छता सर्वेक्षणाच्या पहिल्या आणि दुसऱया तिमाहीचे निष्कर्ष समोर आले आहेत. इंदोर शहराने पुन्हा पहिला क्रमांक मिळविला आहे. 4-31 जानेवारी 2020 पर्यंत स्वच्छ सर्वेक्षण चालणार आहे. या सर्वेक्षणातही पहिला क्रमांक प्राप्त करण्याचे लक्ष्य असल्याचे गौड यांनी म्हटले आहे.
आदर्श रस्ता
इंदोरमधील आदर्श रस्ता सध्या चर्चेत आला आहे. युरोपची आठवण करून देणाऱया या रस्त्याच्या निर्मितीकरता 7 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा रस्ता पाहण्यासाठी अनेक लोक येत आहते. 15 जानेवारी रोजी 20 खासदारांचे पथक या रस्त्याची पाहणी करणार आहे. तर माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान 3 जानेवारी रोजी याचे उद्घाटन करणार आहेत.