कंत्राटदाराने दखल न घेतल्यास स्वच्छता निरीक्षकांकडे तक्रार नोंदविण्याचे महापालिकेचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील कचऱयाची उचल करण्यात येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. स्वच्छता करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर सोपवूनही मनपा अधिकाऱयांना टार्गेट केले जात आहे. वास्तविक पाहता अस्वच्छतेस कंत्राटदार जबाबदार असून कंत्राटदार आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे स्वच्छतेच्या कामाकरिता प्रथम कंत्राटदाराशी संपर्क साधावा. जर कंत्राटदाराने दखल न घेतल्यास स्वच्छता निरीक्षकांकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डच्या कंत्राटदाराचे तसेच मुकादम आणि स्वच्छता निरीक्षक यांचा संपर्क क्रमांक महापालिकेच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.
स्वच्छतेबाबत कुणाकडे तक्रार करायची, तसेच कोणत्या अधिकाऱयाला सांगायचे असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वॉर्डस्तरीय अधिकाऱयांची नावे व संपर्क क्रमांक प्रसिद्ध केल्याने नागरिकांना सोयीचे होणार आहे.