प्रतिनिधी/ कराड
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सलग दोन वर्षे देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱया कराड नगरपालिकेने महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानातही राज्यात 222 नगरपालिकांमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागातर्फे प्रथमच ही स्पर्धा घेण्यात आली. पर्यावरण दिनानिमित्त शनिवारी ऑनलाइन पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला.
ऑनलाईन पुरस्कार वितरण कार्यक्रमास मुंबईतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोड, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होते. कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी ऑनलाइन पुरस्कार स्वीकारला.
येथील पालिकेच्या सभागृहात ऑनलाईन पुरस्कार स्वीकारण्यासाठी नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, भाजपचे गटनेते विनायक पावसकर, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, मुख्याधिकारी रमाकांत डाके, नोडल ऑफिसर रफीक भालदार उपस्थित होते.
पालिका गटातील पुरस्कार मंत्री थोरात यांनी जाहीर करताना मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. राज्यातील 222 पालिकांनी या अभियानात सहभाग घेतला होता. त्यापैकी सहा पालिकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यात तीन पालिकांना उत्तेजनार्थ व अनुक्रमे पहिले तीन पुरस्कार जाहीर झाले. उत्तेजनार्थ पालिकांचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पहिल्या तीन क्रमांकाबाबत मोठी उत्सुकता होती. यामध्ये कराड पालिकेला दुसऱया क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. तर पहिला क्रमांक हिंगोली पालिकेने पटकावला. या पुरस्कारासाठी तीन कोटी रुपयांची बक्षिसाची रक्कम आहे. पुरस्कार जाहीर होताच येथील सभागृहात उपस्थित पदाधिकारी व कर्मचाऱयांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. यावेळी पालिकेच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी करून कर्मचाऱयांनी आनंदोत्सव साजरा केला. कर्मचाऱयांनी पालिका परिसरात लाडूचे वाटप केले. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे.