अध्याय अकरावा
भगवंत म्हणाले, आपल्या आवडत्या दैवताची सर्वांगसुंदर मूर्ती घडवून एखाद्या थोर पुरुषाच्या हातून तिची प्राणप्रति÷ा करावी. विस्तीर्ण देवालय बांधावे. त्याच्या सभोवार वन, उद्यान व उपवन करावे. मळे, बागा, तलाव, विहिरी बांधून सारे स्थळ विश्रांती घेण्याजोगे रमणीय करून सोडावे.
रात्रंदिवस वेदाध्ययन, शास्त्रश्रवण व कीर्तन होत असावे. द्रव्य नसेल तर श्रीमान् लोकांचे साहाय्य घेऊन भक्तियुक्त अंतःकरणाने सर्व पार पाडावे. अशा भव्य कामांच्या मागे ईश्वरी इच्छा कार्य करत असते व करणाऱयाच्या पाठीवर ईश्वरी वरदहस्त असतो.
देवळातील रोजची पूजा अर्चा व्यवस्थित होतीये ना याकडेही लक्ष असावे. जो मूर्तीची प्रतिष्ठा करण्याचे कर्तव्य जाणतो, तो द्रव्य खर्चून मोठी भक्ती ठेवतो. अगदी हलके काम करणेसुद्धा देवाचेच काम आहे असे समजतो. भक्ताने अभिमान धरू नये, मानाची किंवा सन्मानाची इच्छा करू नये. देवालयाकडे जे काय दान दिले असेल, त्याची कधीही वाच्यता करू नये.
यजमान आपण केलेले जेव्हा आपल्याच तोंडाने सांगू लागतो, तेव्हा ते केलेले सर्व निष्फळ होऊन गेले असे समजावे. शेतकरी धान्य पेरून लगेच ते झाकून टाकतो, तेव्हाच ते पीक जोराने येते. त्याप्रमाणे दान हे न बोलले तरच फलदायक होते. देवाचा प्रसाद घेतानासुद्धा लोभाने सर्व आपणच घेऊ नये. तो आधी सर्वांना वाटावा आणि मग थोडासा आपण घ्यावा. देवळातल्या वस्तू घरात वापरू नयेत. ही सारी बाह्य पूजा झाली पण अंतःकरणांत मजवर दृढतर विश्वास व भक्ती पाहिजे. ती भक्तीच भगवंताला आवडते. भाविकांची पूजा भक्तीनेच होत असते. आता भक्तीचे रहस्य ऐक. या लोकांत जी जी काही उत्तम व आवडती वस्तु असेल, ती ती ते मलाच अर्पण करतात. फार काय सांगावे ? पण खरोखर भक्ताच्या हाती जर अकस्मात् चंद्रामृत प्राप्त झाले, तरी तो ते सारेच देवाला अर्पण करतो. देहाच्या लोभाने स्वतः सेवन करीत नाही. देहाला अमरत्व प्राप्त व्हावे म्हणून एखाद्याने लोभाने अमृताचे सेवन केले, तर देवही अमृतपान करीत असून तेही सर्व यथाकाली मरतात हे लक्षात घेऊन माझे भक्त नश्वर देहाच्या ममतेने अमृताचे सेवन करत नाहीत. तेच भगवंताला अर्पण केले तर अक्षय अमरत्व प्राप्त होते. याचना न करताच केवळ दैवयोगाने परीस किंवा चिंतामणि भक्ताच्या हाती आला तर तो लोभाने त्याला मुळीच आपल्याजवळ बाळगत नाही. तत्काळ भगवंताला अर्पण करतो. लोभाने कल्पतरु जतन केला असता अकल्पीतपणे इच्छा वाढते पण तोच कल्पतरु भगवंताला अर्पण केला तर आपोआप निरिच्छता प्राप्त होते. स्वार्थाने चिंतामणि जवळ बाळगला तर तो अंतःकरणामध्ये अतिशय चिंताच वाढवितो. तोच भगवंताला अर्पण केला की, अंतःकरणाला निश्चिंतता प्राप्त होते.
आपण कामधेनूचा प्रतिपाळ केला असता ती अनिवार इच्छा मात्र वाढविते पण तीच कामधेनु कृष्णार्पण केली असता अंगामध्ये परिपूर्ण निरपेक्षता ठसते. आशेला गुंतून परीस जवळ केला तर तो धनलोभाला वाढवितो पण तोच परीस भगवंताला अर्पण केला तर मनुष्य अर्थाच्या स्वार्थापासून मुक्त होतो. देशकालऋतूप्रमाणे जे जे उत्तम पदार्थ किंवा फळे उत्पन्न होतात किंवा नवी धान्ये पिकतात, ती सर्व भक्तिभावाने भक्त मला अर्पण करतात. मनापासून आवडणारा पदार्थ प्राप्त झाला असता त्याचा लोभ सोडून तो सर्व मलाच अर्पण करतात. आपल्या मनातली सर्व आवड त्यांनी सर्वस्वी हरिचरणांकडेच लावलेली असते.
आता त्याचप्रमाणे भिन्न भिन्न पदार्थाची जी गोडी असते, तीही ते प्रत्यक्ष मलाच अर्पण करतात. मज अनंताच्या हातात माझ्या भक्तांनी आवडीने जे दिलेले असते, त्यांची फले वर्णन करताना वेदसुद्धा अगदी मुके होऊन जातात. मी तर वेद बोलणारा, पण मलासुद्धा ते फल खरोखर सांगता यावयाचे नाही. उद्धवा ! आता असे समज की, त्याचे फळ म्हणजे मी स्वतःच होय. उद्धवा ! जिवापेक्षाही जास्त अशी माझ्यावर जी अत्यंत प्रीति, तिचेच नाव खरी भक्ती, हे निश्चयपूर्वक लक्षात ठेव.
क्रमशः