भारताचे पहिले ‘रेडिएशन’विरोधी क्षेपणास्त्र : ‘डीआरडीओ’कडून विकसित
वृत्तसंस्था/ बालासोर
भारतीय हवाई दलासाठी ‘रुद्रम’ या रेडिएशनविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (डीआरडीओ) वैज्ञानिकांनी विकसित केलेले हे क्षेपणास्त्र सुखोई-30 या लढाऊ विमानातून सोडण्यात आले. ‘रुद्रम’ लक्ष्य गाठण्यात पूर्णपणे यशस्वी झाल्याचे ‘डीआरडीओ’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूंचे हवाई तळ नष्ट करण्यासाठी तयार केलेले आहे. ते शत्रूच्या पाळत ठेवणारे रडार, ट्रकिंग आणि दूरसंपर्क व्यवस्थेला सहज लक्ष्य करू शकते.
हवाई दलाच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर हे आपल्याकडील अशा प्रकारचे पहिले क्षेपणास्त्र असेल. नवीन पिढीतील या अँटी-रेडिएशन क्षेपणास्त्राचा (एनजीएआरएम) पल्ला 100 ते 200 किलोमीटर दरम्यान आहे. डीआरडीओने तयार केलेले हे पहिले हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. डीआरडीओने यापूर्वी रशियाच्या सहकार्याने याच प्रकारात ब्राम्होससारख्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आहे.
शुक्रवारी सकाळी ओडिशातील किनाऱयावरील बालासोर रेंजवरून बंगालच्या उपसागरात त्याची चाचणी घेण्यात आली. ‘रुद्रम’चे वजन 140 किलो आहे आणि सॉलिड रॉकेट मोटरने ते सुसज्ज आहे. सध्या त्याची सुखोई एस-30 एमकेआयवरून चाचणी घेण्यात येत आहे. परंतु पुढे ते मिराज-2000, जग्वार, तेजस आणि तेजस मार्क-2 वरून देखील वापरले जाऊ शकते. लढाऊ विमान कुठल्या उंचीवरून उड्डाण करते त्यावर त्याचा पल्ला अवलंबून असतो. हे क्षेपणास्त्र 500 मीटर ते 15 किलोमीटरपर्यंतच्या उंचीवरून सोडले जाऊ शकते.
सदर क्षेपणास्त्राच्या पुढील भागात रेडिएशनच्या स्रोताचा मागोवा घेणारी व्यवस्था आहे. ते केवळ सोडले जाण्यापूर्वीच नव्हे, तर सोडल्यानंतरही लक्ष्य निश्चित करू शकते. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून ‘रूद्रम’च्या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओच्या चमूचे अभिनंदन केले आहे. चीनबरोबरच्या नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सतत क्षेपणास्त्रांची चाचणी करत आहे. एप्रिल-मेपासून भारताने चार क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. यापैकी एक ‘निर्भय’ क्षेपणास्त्र ‘एलएसी’वर तैनात आहे. 3 ऑक्टोबरला शौर्य या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.