पंतप्रधानांचा दावा – लसनिर्मितीतील योगदानाबद्दल शास्त्रज्ञांचे केले कौतुक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील वैज्ञानिक आणि संशोधकांच्या कामगिरीमुळे देश प्रत्येक क्षेत्रात पुढे वाटचाल करत आहे. भारताने वर्षभरात कोरोना प्रतिबंधक लस तयार करुन आत्मनिर्भर झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सीएसआयआर’च्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत व्यक्त केली. पंतप्रधानांनी यावेळी वैज्ञानिक आणि संशोधकांनी कोरोनाविरुद्धच्या लढय़ात दिलेल्या योगदानाविषयी त्यांचे कौतुक केले. वर्षभरातच देशाने कोरोना प्रतिबंधक लस तयार करून जगाला दिली हे वैज्ञानिकांच्या परिश्रमाचे फळ असल्याचेही मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सीएसआयआर सोसायटीची बैठक झाली. यावेळी बोलताना आता सगळय़ाच क्षेत्रामध्ये आपला देश पुढे जात आहे. आपल्याला आता योग्य नियोजन करुन आणि निश्चित दिशेने देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सध्या आपल्या प्रगतीचा वेग कोरोनामुळे मंदावला असला तरीही आत्मनिर्भर भारत हाच आपला संकल्प आहे. वैज्ञानिकांची कोरोनाकाळात परिश्रम घेऊन आत्मनिर्भर होण्याची भूमिका ज्याप्रमाणे घेतली त्याप्रमाणेच आता आपल्याला प्रत्येक क्षेत्रात खंबीरपणा दाखवावा लागेल असे मोदी म्हणाले.
कोरोना जागतिक महामारी हे संपूर्ण जगभरात शतकातील सर्वात मोठे आव्हान म्हणून समोर आली आहे. मानवतेवर मोठे संकट आले असताना भारताने फार मोठे काम बजावलेले आहे. आज आपल्या देशातील वैज्ञानिक इतर देशांसोबत खांद्याला खांदा लावून चालत आहेत. आमच्या वैज्ञानिकांनी 1 वर्षाच्या आतच मेड इन इंडिया कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. आज भारत शाश्वत विकास आणि स्वच्छ उर्जा क्षेत्रात जगाला मार्ग दाखवित आहे. सॉफ्टवेअरपासून उपग्रहापर्यंत आपण अन्य देशांच्या विकासालाही वेग देत आहोत, जगाच्या विकासात भारत मुख्य इंजिनची भूमिका निभावत आहे, असे मोदी म्हणाले.