मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्याचे विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा सोमवारी, आज प्रथम दिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ २ दिवसांचे ठेवण्यात आले आहे. अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी एमपीएससी परीक्षेतील उमेदवार स्वप्नील लोणकर यांनी केलेल्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत मांडला. स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांस ५० लाख रुपयांची मदत देण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येनंतर ४३० विद्यार्थी आम्हीपण आत्मदहन करु, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फोन करुन सभागृहात हा विषय मांडण्याची मागणी केली आहे. नोकरीच्या वयोमर्यादेत दोन वर्ष वाढ द्या, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण हलका होऊ शकतो, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये सरकारनं द्यावेत, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली. राज्य सरकारला माहिती आयुक्त आणि एमपीएससीचे सदस्य नियुक्त करता आले नाहीत, असा सवाल त्यांनी केला.
मुलाचा मृतदेह आई वडिलांच्या खांद्यावर खूप मोठे ओझे असते. एमपीएससीमध्ये पदे भरता येत नाहीत. तो मुलगा आईला सांगतो मी प्रिलिम पास केली, मेन पास केली, पण इंटरव्ह्यू झाला नाही आणि आत्महत्या करतो. किती गंभीर विषय आहे. हे दगडी मनाचे सरकार आहे. स्वप्निलच्या आईच्या मुलाखतीचा व्हिडीओ तुम्ही सभागृहात दाखवा, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केले.
३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार – अजित पवार
देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधी एमपीएससीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. यावेळी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर याची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवली. राज्य सरकार एमपीएससी बाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. अशावेळी सरकार आणि आयोग नेमकं काय करतंय? असा सवाल फडणवीसांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीसांच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा अधिवेशनात केली.