श्रीकृष्णाचे वर्णन रुक्मिणीपाशी करताना बलरामदादा पुढे म्हणतात-आकाश सर्वत्र विराजमान आहे, म्हणून जर कोणी त्याला चिखल फासू पाहील तर तो स्वतःच चिखलाने माखला जाईल. पण आकाश मात्र अलिप्तच राहील. तसेच श्रीकृष्णाचे स्वरूप आहे, हे तू जाण. हा भोग भोगून अभोक्ता आहे. हा सारी कर्मे करून अकर्ता आहे. हा स्वतःच्या बोधाने सदोदित अलिप्त आहे. कृष्ण एखाद्या कर्माचा कर्ता आहे असे जे मानतात ते मानणे हाच एक अधर्म त्यांच्याकडून घडतो. तू हे जाणून घे की कृष्ण हा नेहमीच निष्कर्म आहे.
यालागीं तूं वो ऐसें जाण । देहासीच जन्ममरण ।
आत्मा अविनाश परिपूर्ण । जीवि हे खूण राखावी ।।
लोकप्रवाद प्रबळा । नाश मानिती केवळा ।
चंद्री तुटलिया कळा । म्हणती नासला अंवसे सी ।।
चंद्री चंद्र यथास्थिती । कळाची तुटली वाढती ।
तैसा आत्मा सहजस्थिती । नाशउत्पत्ती देहासी ।।
रुक्मिणी! तू हे जाण की देहालाच जन्म मरण असते. आत्मा हा सदाचाच अविनाशी परिपूर्ण आहे. जसे लोक हे मानतात की चंद्र कलेकलेने लहान होत अमावास्येला पूर्णपणे नष्ट होतो. पण चंद्र कधीही लहान होत नाही की मोठा होत नाही. तो सदोदित परिपूर्ण आहे. फक्त आपल्याला तसा भास होतो. तसेच फक्त शरीर जन्मते किंवा नष्ट होते. आत्मा सहजस्थितीत सदैव परिपूर्ण आहे.
जैसी वांझेची संतती । तैसी संसार उत्पत्ती ।
भ्रांत सत्यत्वे मानिती । मिथ्या प्रतीति प्रबुद्ध।।
स्वप्नी देखे आत्ममरण । चित्ते सी घालूनि देह दहन ।
जागृती उदयी मिथा स्वप्न । जन्ममरण मज नाही ।।
ऐसाचि जाण संसारक्रम । यालागी भीमकी सोडी भ्रम ।
कृष्ण पावलीसी पुरुषोत्तम । मिथ्या भ्रम करू नको ।।
स्वप्नी सोयरिया जाले दु:ख । सत्य मानिती ते तंव मूर्ख ।
बंधु वैरूप्याचे असुख । सोडी निःशेष वेल्हाळे ।।