आंबेडकरनगर येथील सभेत मायावतींचा दावा
बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी शनिवारी आंबेडकरनगर येथील जाहीर सभेत बोलताना पूर्ण उत्तरप्रदेशात बसप स्वबळावर निवडणूक लढवत असून यंदा राज्यात आमचे सरकार येणार असल्याचा दावा केला आहे.
चुकीच्या धोरणांमुळे काँग्रेस पक्ष देश आणि उत्तरप्रदेशातून गायब झाला आहे. काँग्रेस दलितांच्या मतांकरता वेगवेगळय़ा प्रकारची नाटकं करत राहत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
समाजवादी पक्ष आणि भाजप सरकार असताना राज्यातील जनतेला फार काही प्राप्त झालेले नाही. राज्यात विकास एक व्यक्तीविशेष आणि एका समुदायापुरती मर्यादित राहिला आहे. सप सरकारमध्ये राज्यात सरकारी क्षेत्रांमधील आरक्षण संपविण्यात आल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे.
मायावती यांनी राम अचल राजभर, लालजी वर्मा, त्रिभुवन दत्त आणि राकेश पांडे यांचा थेट उल्लेख टाळून या सर्वांना पक्षाला छोटय़ा छोटय़ा समुहांमध्ये विभागण्याचा आरोप केला आहे. तीन समुहांमध्ये पक्ष विभागला गेल्याने स्थानिक निवडणुकीत नुकसान झेलावे लागले. याचमुळे या सर्वांना पक्षातून हाकलण्यात आले आहे. या नेत्यांची हकालपट्टी करून पक्षाला भविष्यात होणाऱया नुकसानीपासून वाचविण्यात आले. विरोधकांच्या क्लृप्त्यांपासून सावध राहण्याची गरज असल्याचे मायावती यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना म्हटले आहे.