मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे उद्गार : बेतोडा येथे जलवाहिनाच्या कामाला प्रारंभ
वार्ताहर /दाभाळ
कोरोना महामारीने राज्याला मोठा धडा दिला आहे. भाजीपासून इतर बहुतेक गोष्टींसाठी आपण आजवर इतर राज्यांवर आपण अवलंबून होतो. स्वयंपूर्ण गोंय योजनेमुळे आपण स्वयंपूर्णतेकडे पाऊल टाकले आहे व त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. राज्यातील प्रत्येक घटक स्वयंपूर्ण व्हावा हा भाजपा सरकारचा उद्देश आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
शिरोडा मतदार संघातील जनसंपर्क दौऱयात बेतोडा येथे नव्याने घालण्यात येणाऱया जलवाहिनीच्या कामाला शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी स्थानिक आमदार सुभाष शिरोडकर, सरपंच विशांत गावकर, पंचसदस्य गुरु सालेलकर, मंदा गावडे, उज्ज्वला गावडे, विकास प्रभू, जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर, शिरोडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष सूरज नाईक, बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते निवृत्ती पार्सेकर, साहाय्यक अभियंते यशवंत मापारी, कनिष्ठ अभियंते काशिनाथ सराफ, तांत्रिक सहाय्यक मनोज नाईक, कंत्राटदार विजय पै व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामीण भागातील जनतेला चांगले रस्ते, सुरळीत पाणी, वीजपुरवठा व आरोग्य या प्राथमिक सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना सांगितले.
मागील कित्येक वर्षांपासून बेतोडय़ातील नागरिकांना पाण्याची तिव्र समस्या जावणत होती. त्यासाठी अधिक क्षमतेची जलवाहिनी टाकण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्याची पूर्तता करताना 300 मि. मी. व्यासाची ही जलवाहिनी बेतोडा औद्योगिक वसाहतीच्या जलकुंभापर्यंत घालण्यात येणार आहे. अंदाजे रु. 2 कोटी खर्चून हे काम हाती घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
शिरोडा मतदार संघाचा सर्वांगिण विकास व्हावा, येथील नागरिकांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार म्हणून आपले सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. येणाऱया चार ते पाच महिन्यांत जास्तीत जास्त कामे मार्गी लागतील असे सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. सरपंच विशांत गावकर यांनी स्वागत केले.