सरकारकडून गंभीर दखल : महाराष्ट्रातील वाहने त्वरित हटविण्याचा आदेश
प्रतिनिधी /पणजी
गोव्याला ‘स्वयंपूर्ण’ बनविण्याच्या सरकारच्या प्रयत्नांनाच गालबोट लावणाऱया ‘सनलाईट मीडिया’ या जाहिरातदार कंपनीस सरकारने कानपिळी दिली असून जाहिरातीसाठी महाराष्ट्रातील वाहने वापरणे त्वरित बंद करावे, असे बजावले आहे.
‘स्वयंपूर्ण गोवा’, ‘गोवा ऍट द रेट 60’ आणि ‘तुमच्या योजना जाणा’ यासारख्या अभियानचा प्रचार, प्रसार करण्यासाठी सनलाईट मेडिया नामक कंपनीस कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार वाहनावर चित्ररथ स्थापन करणे व त्याद्वारे स्थानिक युवक आणि नागरिकांना स्वयंपूर्ततेसाठी प्रोत्साहित करणे, आदी कामे करण्याची अट होती.
परंतु सदर चित्ररथ बनविण्यासाठी कंत्राटदाराने शेजारील महाराष्ट्र नोंदणीच्या वाहनांचा वापर केला. हा प्रकार अनेक पत्रकार तसेच विरोधक राजकीय नेते व कार्यकर्त्यांच्याही लक्षात आला. त्यावरून सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. काँग्रेसने तर त्याचा चांगलाच फायदा उठवताना सरकारवर टीकेची झोड उठविली. तसेच सदर प्रकार बंद न केल्यास काँग्रेस कार्यकर्ते ती वाहने अडवतील असा इशाराही दिला.
विद्यमान सरकार अनेक क्षेत्रात शेजारील राज्यातील लोकांना संधी देत असल्याचा आरोप करण्याची संधीही काँग्रेसने सोडली नाही. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून गोमंतकीयांचे हित न जपता गोवा परप्रांतीयांना विकण्याचेच काम करत आहे. म्हणुनच खुद्द मुख्यमंत्र्यांचा कथित ’स्वयंपूर्ण गोवा चित्ररथ’ बाहेरच्या वाहनावर स्थापन करून गोवा परावलंबी असल्याचे चित्र निर्माण करत आहे, अशी टीकाही काँग्रेसने केली आहे.
दरम्यान, विविध माध्यमांद्वारे सदर प्रकार लक्षात येताच खडबडून जागे झालेल्या सरकारने मंगळवार दि. 21 रोजी आदेश जारी करून कंत्राटदारास दम दिला. त्या वाहनांचा वापर त्वरित थांबवावा, तसेच भविष्यात अशाप्रकारच्या आवश्यकता भासलीच तर स्थानिक वाहने आणि स्थानिक कलाकारांचाच वापर करावा, असेही आदेशात बजावले आहे. गोव्याशी संबंधित एखाद्या योजनेच्या प्रचारासाठी परराज्यातील वाहने किंवा कलाकारांचा वापर करणे म्हणजे या संकल्पनेच्याच विसंगत प्रकार होईल, असेही सरकारने कंत्राटदारास बजावलेल्या नोटिसीत म्हटले आहे.