नाटय़ परिषद बेळगाव शाखेतर्फे आयोजन
प्रतिनिधी / बेळगाव
कवी कुसुमाग्रज यांची कविता स्वतःच्या ठिकाणी फारशी रमली नाही. त्यांच्या कवितेतून समाज मन बोलत होते. कधी समुहात मिसळून तर कधी समुहाचा प्रतिनिधी होऊन, कधी कधी समाज जीवनाचा अर्थ शोधणारा चिंतक होऊन त्यांनी रसिकांशी संवाद साधला. स्वातंत्र्यलढय़ाच्या चळवळीला त्यांच्या कवितेने शब्द दिला, हे लक्षात घेऊन मराठी नाटय़ परिषदेच्या बेळगाव शाखेने ‘स्वरकुसुम’-वि. वा. शिरवाडकर एक झलक हा कार्यक्रम सादर केला. लेखन, दिग्दर्शन आणि संकल्पना शाखा अध्यक्षा संध्या देशपांडे यांची होती.
‘माझ्या मनात शलाका! विश्वगर्भ आकाशाची माझ्या प्रज्ञेतून उदे! भागिरथी प्रकाशाची’
अशी प्रकाशाची पूजा बांधणाऱया शिरवाडकरांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. बालपणापासूनच साहित्याची गोडी त्यांना लागली आणि काव्य व नाटक या वाङ्मय प्रकाराकडे ते आकर्षित झाले. ‘ययाती देवयानी, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला’ या त्यांच्या नाटकांना राज्य पुरस्कार मिळाले. त्यांच्या ययाती देवयानी नाटकातील ‘यती मन मम मानीत’ हे गीत श्रीधर कुलकर्णी यांनी सादर केले. नटसम्राट हे त्यांचे अत्यंत गाजलेले नाटक. त्यातील एका प्रवेशाचे अभिवाचन सुधीर शेंडे आणि वीणा लोकूर यांनी केले.
वीज म्हणाली धरतीला हे झाशीच्या राणीच्या जीवनावरील नाटक. या नाटकातील ‘स्मरशील गोकुळ सारे’ हे गीत अनुष्का आपटे यांनी सादर केले. तसेच हे सुरांनो चंद्र व्हा, हे गीतही त्यांनी सादर केले. स्वातंत्र्याचा किनारा समोर दिसू लागला तेंव्हा सरायास संग्राम आला, आला किनारा किनारा हे गीत त्यांनी लिहिले. प्राची हलगेकर यांनी ते सादर केले. गांधी वादाच्या पराभवाचे नेमके चित्रण असलेली ‘अखेर कमाई’ या कवितेचे वाचन प्राजक्ता बेडेकर यांनी केले. कौंतेय नाटकातील एका प्रसंगाचे अभिवाचन प्राचार्य प्रणव पित्रे आणि प्रा. अरुणा नाईक यांनी केले.
क्रांतीची अनिवार्यता शिरवाडकरांना पटली होती. परंतु युद्धातील क्रौर्य त्यांना मान्य नव्हते. खाकी वर्दीतील माणसांबद्दल ते वेगळा विचार करतात. तसेच प्राणार्पण करणाऱया वीरांचाही विचार करतात. म्हणूनच ‘अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत’ अशा शब्दांची कविता ते लिहू शकतात. त्याचे सादरीकरण प्राची हलगेकर यांनी केले.
माणसाने आपली स्वतःची, या जगाची आणि मर्यादा ओळखावी हे त्यांचे तत्त्वज्ञान होते. आपल्या दुःखाकडे ते निराकार ईश्वराच्या रुपात पाहतात. म्हणूनच तो सर्वात्मक सर्वेश्वर आहे, असे ते लिहून जातात. या कवितेचे गायन श्रीधर कुलकर्णी यांनी केले. निवेदन संध्या देशपांडे यांनी केले. गीता कित्तूर यांनी आभार मानले.