सहजस्फूर्त अभिनयातून आणि स्वरमधुर गायकीतून मागील सहा दशके संगीत रंगभूमीची सेवा करणाऱया ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने संगीत नाटकाच्या धुरंधर शिलेदारालाच नाटय़सृष्टी मुकली आहे. मराठी रंगभूमीचा गाभा म्हणून आपण संगीत रंगभूमीकडे पाहतो. या संगीत नाटकाचा प्रवाह पुढे नेण्यात व समृद्ध करण्यात अनेक रंगकर्मींनी अतुलनीय योगदान दिले. त्यात अभिनय व गायन अशा दोन्ही पातळय़ांवर संगीत नाटकाला बोलते करण्याचा कीर्तीताईंनी साधलेला सुवर्णसंगम विलक्षणच म्हणायला हवा. संगीत नाटक हेच जीवनध्येय मानून जयराम आणि जयमाला शिलेदार या दांपत्याने तहहयात रंगभूमीची सेवा करण्याचे व्रत पाळले. हाच संगीतनाटय़कलेचा वसा नि वारसा जपत नि आपला स्वतंत्र ठसा उमटवित या क्षेत्रात त्यांनी मिळविलेली कीर्तीच त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल सारे काही सांगून जाते. वयाचे दशक हे तसे खेळण्याबागडण्याचे. या वयातच रंगभूमीवर पाऊल टाकत अवघ्या काही वर्षांत त्या रंगभूमी व्यापून टाकतात, हे अचंबित करणारेच. लता, कीर्ती शिलेदार यांच्यासह चुलतभाऊ सुरेशच्या साथीने हे तीन बालकलाकार आलटून पालटून सगळय़ा भूमिका साकारत सौभद्रचा प्रयोग सादर करीत असत. या बालसौभद्रचे ज्येष्ठ समीक्षक व कलावंतांकडून मनसोक्त कौतुक झाले. त्यानंतर वयाच्या चौदाव्या वर्षी ‘शारदा’, अठराव्या वर्षी ‘स्वयंवर’ साकारत कीर्तीताईंनी आपली नाटय़ कारकीर्द फुलवत नेली. पुढे संगीत सौभद्रमधील सुभद्रा, शाकुंतलमधील शकुंतला, कान्होपात्रामधील कान्होपात्रा या भूमिकांमध्ये आपला जीव ओतत त्यांनी या कलाकृती अजरामर केल्या. संगीत मानापमान, संशयकल्लोळ, मृच्छकटिक, दौपदी, ययाती आणि देवयानी, विद्याहरण, अशा पारंपरिक नाटकांबरोबरच त्यांनी रंगात रंगला श्रीरंग, रुपमती आणि बाजबहाद्दर, अभोगी, श्रीरंग प्रेमरंग, चंद्रमाधवी अशी नाटकेही यशस्वी करून दाखविली, हा त्यांचा विशेष. विद्याधर गोखले यांचे ‘स्वरसम्राज्ञी’ हे नाटक म्हणजे कीर्तीताईंसाठी मैलाचा दगड. या नाटकाने रंगभूमीवर नवा इतिहास घडविला. गोखले यांनी कीर्तीताईंना डोळय़ासमोर ठेऊनच या नाटकाची रचना केली होती. या नाटकापासूनच त्यांना पं. नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्यासारख्या चतुरस्र गुरूंचा लाभ झाला. पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्तीताईंसाठी ‘संगीत नाटक’ हाच वास्तविक श्वास, ध्यास व अभ्यासाचा विषय होता. गोड गळा ही त्यांना मिळालेली निसर्गदत्त देणगी. त्याला आपल्या परिश्रम व रियाझाचे कोंदण देत त्यांनी संगीत नाटकात वेगळी उंची गाठली. शास्त्राrय संगीत, नाटय़संगीत, ठुमरी कोणताही प्रकार असो. सहजता हे त्यांच्या कलेचे वैशिष्टय़ होते. त्यांच्या नाटय़ कारकिर्दीवर प्रकाश टाकला, तर ती किती देदीप्यमान आहे, याची प्रचिती येते. आत्तापर्यंत तब्बल 24 संगीत नाटकांतून त्यांनी 42 वेगवेगळय़ा प्रकारच्या भूमिका रंगविल्या आहेत. त्यातील प्रयोगांची संख्याही तब्बल 4 हजारांहून अधिक आहे. अर्थात त्याचा गुणात्मक आलेख हा यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे, हे वेगळे सांगावयास नको. कीर्ती शिलेदार यांनी गायलेली अनेक नाटय़गीते तर रसिकांनी अक्षरशः डोक्मयावर घेतली. नरवर कृष्णासमान (संगीत स्वयंवर), एकलीच दीपकळी मी (संगीत स्वरसम्राज्ञी), नाही मी बोलत (संगीत एकच प्याला) अशी कितीतरी नाटय़पदे त्यांच्या स्वरसाजाने अजरामर झाली. एक काळ संगीत रंगभूमीसाठी सुवर्णकाळ होता. मात्र, त्यानंतर संगीत नाटकांचा पडता काळ सुरू झाला. या काळात या रंगभूमीला सावरण्याचे, जिवंत ठेवण्याचे नि पुन्हा नवी ऊर्जा देण्याचे काम इतक्या भक्कमपणे कुणी केले असेल, तर ते कीर्तीताईंनी. मुख्य म्हणजे पैसा, कीर्ती यापैकी कशालाही न भुलता हा स्वरयज्ञ त्यांनी सुरूच ठेवला, हे त्यांचे कार्य अद्वितीय होय. केवळ अभिनय व गायन इतकीच सीमित या स्वरसम्राज्ञीची कारकीर्द नाही. तर जयराम शिलेदार यांच्या पश्चात मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेची धुराही त्यांनी समर्थपणे सांभाळल्याचे सर्वांनी पाहिले आहे. तरुण कलाकारांना वाव मिळावा, याकरिता त्यांनी ‘गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाटय़ सेवा ट्रस्ट’ची मुहूर्तमेढ रोवली. हौशी कलाकारांकरिता नाटय़ संगीत स्पर्धांचे आयोजन करणे, संगीत नाटय़ प्रवेश, एकांकिका स्पर्धा, संगीत नाटय़ शिबिरे, युवा कलाकारांच्या संचात नवीन जुन्या नाटकांची निर्मिती अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांचा पुढाकार असे. शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीतावरील देशविदेशातील दोन हजारांवर मैफली, संगीत रंगभूमीवरील सप्रयोग व्याख्याने, याच विषयावर वेगवेगळय़ा नियतकालिकांतून केलेले प्रासंगिक यातून त्या कशा आणि किती प्रकारे संगीत नाटकाशी जोडल्या गेल्या होत्या, हे कळते. मानाच्या पुरस्कारांबरोबरच 98 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणातून त्यांनी मांडलेले विचारही कायम दिशादर्शक ठरावेत असेच होत. करमणुकीच्या तोंडवळय़ावरून त्या-त्या राज्याची, देशाची सांस्कृतिक ओळख होत असते. महाराष्ट्र नाटय़ व संगीतवेडा आहे. मात्र, नवमाध्यमांच्या स्फोटाने या जिवंत कलाप्रकारावर आक्रमण होत आहे. यातून नाटकवेडा महाराष्ट्र ही ओळख पुसली जाता कामा नये, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली होती. त्याचबरोबर पूर्वी बालरंगभूमीतून कलाकार घडत असल्याकडे अंगुलीनिर्देश करीत शालेय अभ्यासक्रमात नाटक हा विषय समाविष्ट करण्याची सूचनाही त्यांनी केली होती. हे सार समजून घेतले पाहिजे. सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी लिहिलेले ‘स्वर ताल शब्द संगती’ हे संशोधनात्मक पुस्तकही सर्वांसाठी उपयुक्त होय. कीर्तीताईंचा इहलोकीचा हा प्रवास थांबला असला, तरी संगीत नाटकासाठीच्या योगदानाच्या माध्यमातून त्या जिवंत व कीर्तीवंतच राहणार आहेत.
Previous Articleरिझवान, ब्यूमाँट वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू
Next Article लहान मुलांचेही संयुक्तिक भाषण ग्राह्य धरावे
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.