अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना प्रेक्षकांनी अनेक भूमिकांमध्ये पाहिलं आणि त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर भरभरून प्रेम देखील केलं. 2019मध्ये सगळय़ांच्या लक्षात राहिलेली मृणाल कुलकर्णी यांची भूमिका म्हणजे फत्तेशिकस्त या चित्रपटात त्यांनी साकारलेली जिजाऊंची भूमिका. चित्रपटासोबतच मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिकेने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. फत्तेशिकस्त या लोकप्रिय चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 16 ऑगस्ट रोजी झी टॉकीजवर होणार आहे. चित्रपटगहात जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच हा चित्रपट प्रेक्षकांना आपल्या घरी आपल्या टेलिव्हिजन क्रीनवर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाबद्दल मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
इतिहास हा माझ्या खूप आवडीचा विषय आहे. मी नेहमी असं म्हणते माझे आजोबा प्रख्यात कादंबरीकार गो. नी. दांडेकर ज्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासावर भरभरून प्रेम केलं आणि ते लोकांमध्ये वाटलं. त्यांच्याकडून हा वारसा मला मिळालेला आहे असा मला वाटतं. मी पहिल्यांदा जिजाऊ आऊसाहेबांची भूमिका साकारली आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा ही भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप जास्त आनंद होतो. एक आई म्हणुन, एक माणूस म्हणुन जिजाऊ आईसाहेबांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. ही भूमिका मी आयुष्यभर जरी करत राहिले तरी मला असं वाटेल कि अजून शिकण्यासारखं खूप आहे. त्यामुळे फत्तेशिकस्त मधील ही भूमिका साकारताना मला अत्यानंद झाला. मला दिग्पाल लांजेकरचा अभिमान वाटतो की त्याने महाराजांचं चरित्र अत्यंत योग्यरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. असे मृणाल कुलकर्णी यांनी सांगितले. भूमिकेच्या तयारीविषयी त्या म्हणाल्या की, आधी ही भूमीका साकारली असल्यामुळे भरपूर वाचन झालेलं होतं. पण प्रत्येक वेळेला नवीन पैलू दाखवण्याची संधी आपल्याला मिळते याचा जास्त आनंद होतो. जिजाऊ आऊसाहेब फक्त कारभार संभाळत नसत तर त्या प्रसंगी तलवारसुद्धा हातात घेत असत. मावळय़ांना वेळेला प्रोत्साहन देऊन त्यांच्या संघटना तयार करत असत. जिजाऊ आऊसाहेबांचं युद्ध नैपुण्य आणि राजकारणातले कौशल्य दाखवण्याची संधी मला फत्तेशिकस्तच्या माध्यमातुन मिळाली. चित्रपट रिलीज झाल्यानंतर मिळालेली सगळ्यात मोठी प्रशंसा याबद्दल मृणाल कुलकर्णी म्हणाल्या की, माझी एन्ट्री झाल्यावर प्रेक्षक भयंकर खुश होत होते. एक आईच आपलं मुल अशाप्रकारे घडवू शकते. ज्या मातेने स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे आपलं स्वप्न मुलाच्या मनात सतत घोळवत ठेवलं आणि बिंबवलं आणि त्याच्याकडून ते पूर्ण करुन घेतलं अशा आईच्या एन्ट्रीसाठी मिळणारा प्रतिसाद हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता. सिनेमाच्या शेवटी येणारं जिजाऊ आऊसाहेबांचं चित्र हा माझ्यासाठी एक थरारक अनुभव होता. या स्वराज्य चळवळीचा प्रारंभ म्हणजेच जिजाऊ आऊसाहेब आहेत याचं भान मला आलं. असे त्या म्हणाल्या.