नवी दिल्ली / वृत्तसंस्था
स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच्या प्रथेप्रमाणे दिल्लीच्या लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून भाषण करणार असून भाषणात कोणते मुद्दे असावेत, यासंबंधी सूचना पाठविण्याचे आवाहन त्यांनी समस्त नागरिकांना केले आहे. आपल्या भाषणातून आपण लोकांचेच विचार देशभरात लाल किल्ल्याच्या सौधावरुन जनतेपर्यंत पोहचविणार आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पंतप्रधान मोदींच्या पोर्टलवरुन हे आवाहन करण्यात आले आहे. 15 ऑगस्टच्या भाषणात सरकारची कामगिरी आणि सरकारच्या योजना स्पष्ट करण्यात येतात. मात्र ते पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी लोकांकडून सूचना मागविण्याची प्रथा सुरु केली आहे. लोकांनी पाठविलेल्या निवडक सूचनांना ते आपल्या भाषणात स्थान देतात. त्यानुसार येत्या काही दिवसांमध्ये लोकांनी सूचना पाठवावयाच्या आहेत.